

देशात सध्या एकूण 1.07 कोटी कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 1.73 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 1.53 लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण गेल्या चार महिन्यांपासून देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटते आहे. देशातील हे चित्र खूपच दिलासादायक आहे.


दररोज नव्यानं होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी लक्षणीयरित्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दररोज 90 हजारांच्या आसपास, ऑक्टोबरमध्ये 50 हजारांच्या आसपास, तर डिसेंबरमध्ये 24 हजारांच्या आसपास नवे रुग्ण होते. 28 जानेवारी, 2021 च्या आकडेवारीनुसार फक्त 11,666 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.


देशासाठी दिलासादायक चित्र असलं तरी महाराष्ट्राची चिंता मात्र कायम आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये आहेत. उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी 40,000 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 67 टक्के प्रकरण या दोन राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात 44,624 तर केरळमध्ये 72,476 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


लसीकरणाबाबतही महाराष्ट्र पिछाडीवरच आहे. भारतात 16 जानेवारी, 2021 पासून लसीकरण मोहीम सुरू झाली. 26 जानेवारी 2021 पर्यंत 2.03 दशलक्ष लोकांचं लसीकरण झालं आहे. दिवसेंदिवस लस घेणाऱ्यांचा आकडाही वाढता आहे.