स्टार प्रवाहवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर असून लवकरच मालिकेत कबड्डीचा सामना देखिल रंगणार आहे.
शालिनीने शिर्केपाटील कुटुंबाची बळकावलेली प्रॉपर्टी मिळवायची तर तिच्यासोबतचा कबड्डीचा सामना जिंकावा लागेल अशी अट असल्यामुळे आता जयदीप-गौरी आणि संपूर्ण कुटुंबाने कंबर कसली आहे.
कबड्डीचा सामना जिंकायचा तर चांगला प्रशिक्षक हवा. याच प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी जयदीप जंगलामध्ये गेला असताना भलत्याच संकटात सापडला आहे.
जयदीपचा पाय झाडाला लावलेल्या फासात अडकला आहे. आणि तो उलटा टांगला गेला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या या सीनसाठी जयदीपची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवने बरीच मेहनत घेतली आहे.
चार ते पाच तास या भागाचं शूटिंग सुरु होतं. हा सीन शूट करणं अवघड तर होतंच आणि तितकंच जबाबदारीचं देखिल. फाईट मास्टर, दिग्दर्शकांच्या सुचना आणि सेटवरील सर्व मंडळींच्या सहकार्याने मंदारने हा अवघड सीन पूर्ण केला आहे .
प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ही जोखीम स्वीकारल्याचं त्याने सांगितलं आहे. हा प्रसंग कायम लक्षात राहिल असंही तो म्हणाला. सुख म्हणजे काय असतं मालिकेतला कबड्डीचा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना लागली आहे.