आपल्या डान्सच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री-डान्सर म्हणजे रानी बेगम होय. रानी बेगमला अभिनेत्री बनवण्याचं संपूर्ण श्रेय पाकिस्तानी गायिका मुख्तार बेगमला जातं. रानी बेगम ही त्यांच्या ड्रायव्हरची मुलगी होती. मुख्तार बेगमला कोणतंही अपत्य नव्हतं. शिवाय त्यांचा ड्रायव्हरही गरीब होता. त्यामुळे गायिकेने रानी बेगमला दत्तक घेतलं होतं. मुख्तारला रानीला गायिका बनवायचं होतं. पण तिच्याकडे गायनाचे गुण नव्हते. म्हणून त्यांनी तिला अभिनयाच्या क्षेत्रात जाण्याची संधी दिली.
रानी बेगमने 1962 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. मात्र 1966 मध्ये आलेल्या 'देवर-भाभी' या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली होती. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'मेरा घर मेरी जन्नत', 'बाबुल' आणि 'सोना चांदी' या चित्रपटांसाठी त्यांना पाकिस्तानचा निगार पुरस्कार मिळाला होता. 'अंजुमन' चित्रपटामध्ये रानीचा अभिनय इतका जबरदस्त होता की, दिग्दर्शक हसन तारिक तिच्या प्रेमात पडले होते.
हसन तारिक हे आधीच विवाहित होते. तरीसुद्धा त्यांनी रानी बेगमशी तिसरं लग्न केलं. या नात्यातून अभिनेत्रीला राबिया ही मुलगी आहे. तिने चित्रपटांमध्ये काम सुरुच ठेवलं होतं. 1972 मध्ये आलेल्या 'उमराव जान अदा' चित्रपटानंतर रानीला खूप प्रसिद्धी मिळाली होती.मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही सुरळीत नव्हतं. टोकाचे मतभेद झाल्यानंतर ती पती हसनपासून विभक्त झाली आणि आपल्या मुलीसोबत एकटी राहू लागली.
रानी बेगमचा हसन तारिकपासून घटस्फोट झाला होता. त्यानंतर अभिनेत्रीचा जुना प्रियकर मियाँ जावेद कमर याने तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं. ते एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. रानीने त्याला होकार देत लग्नाला संमती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मियाँ जावेद तिला इतकं पसंत करत होता की, तो तिला फुलासारखं ठेवत होता. परंतु जेव्हा रानी बेगमला कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासलं तेव्हा तो पालटला. अचानक त्याचं प्रेम नाहीसं झालं.
मियाँ जावेद यांनी कर्करोगाने ग्रस्त पत्नी रानी बेगमला आधार देण्याऐवजी तिच्याकडे पाठ फिरवली. दुसऱ्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर रानी बेगम उपचारासाठी लंडनला पोहोचली. उपचारादरम्यान तिची भेट पाकिस्तानी क्रिकेटर सर्फराज नवाजशी झाली जो तिचा मोठा चाहता होता. अखेरीस, अभिनेत्रीने सर्फराज नवाजशी तिसरं लग्न केलं. जेव्हा क्रिकेटर निवडणुकीला उभा राहिला तेव्हा अभिनेत्रीने त्याचा प्रचार केला आणि त्याला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
क्रिकेटपटू सरफराज नवाजनेही तिची फसवणूक केली. रानी पुन्हा कॅन्सरच्या विळख्यात आली. तिला समजलं होतं की, आता तिच्याकडे जास्त वेळ नाही. आपल्या जिवंतपणी आपल्या लेकीचं लग्न व्हावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती. मुलीचं लग्न एका डॉक्टरशी झालं. पण रानी बेगम लग्नाला येऊ शकल्या नाहीत. 27 मे 1993 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.