यावर्षीची सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा इस्रायलमध्ये झाली. या मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान भारतला मिळाला आहे. 21 वर्षीय हरनाझ संधूच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारतातील सौंदर्यवतीला तिसऱ्यांदा हा मान मिळत आहे. याआधी 1994 मध्ये सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्ताने हा ताज जिंकला होता. आता हरनाझच्या निमित्ताने भारताला तिसऱ्यांदा हा मान मिळाला आहे
चंदीगडच्या शीख कुटुंबात जन्मलेल्या भारताच्या या सौंदर्यवतीने जागतिक पातळीवर भारताचं नाव रोशन केलं आहे. याआधीही तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये विजय मिळवला होता.
हरनाझ फिटनेस आणि योगासाठी प्रसिद्ध आहे. तिने लहान वयातच ब्यूटी काँटेस्टमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. याआधी 2017 साली तिने मिस चंदीगडचा पुरस्कार देखील जिंकला आहे. तर 2018 मध्ये तिने मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया 2018 चा पुरस्कारही मिळवला होता. 2019 साली मिस इंडिया स्पर्धेत तिने Top 12 मध्ये जागा बनवली होती.
हरनाझने 2018 मध्ये मिस इंडिया पंजाबचा ताज मिळवला होता. यानंतर यावर्षी 2021 साली मिस डीवा यूनिवर्स इंडिया 2021 चा ताज आपल्या नावे केला होता. अभिनेत्री कृती सॅननने हरनाझला हा ताज परिधान केला होता.
टॉप 3 फेरीचा एक भाग म्हणून, स्पर्धकांना विचारण्यात आले, 'तरुण महिलांनी आजच्या काळात येणाऱ्या दबावांना कसे सामोरे वे याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल?' यावर हरनाझ म्हणाली की, 'आजच्या तरुणाईवर सर्वात मोठा दबाव आहे तो म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवणे. तुम्ही अद्वितीय आहात हे समजून घेणे तुम्हाला सुंदर बनवते. इतरांशी तुमची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया. बाहेर या, स्वत:साठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेतृत्त्व आहात. तुम्ही तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे.'
हरनाझ आता पुढील वर्षात दोन पंजाबी चित्रपट 'Bai Ji Kuttange' आणि 'Yaara Diyan Poo Baran' मध्ये दिसणार आहे.
टॉप 5 पोहोचल्यावर हरनाझला विचारण्यात आले होते की, 'बर्याच लोकांना हवामान बदल फसवा वाटतो आहे, तुम्ही त्यांना पटवून देण्यासाठी काय कराल?' हरनाझने यावेळी देखील सर्वांना प्रभावित करणारे उत्तर दिले होते. ती म्हणाली, 'निसर्ग ज्याप्रमाणे खूप समस्यांमधून जात आहे हे पाहून माझे हृदय तुटते आणि हे सर्व आपल्या बेजबाबदार वागण्यामुळे आहे. मला वाटते की ही कमी बोलण्याची आणि त्यापेक्षा कृती करण्याची वेळ आहे. कारण आपली प्रत्येक कृती निसर्गाला वाचवू शकते किंवा नष्ट करू शकते. पश्चात्ताप करणे आणि दुरुस्ती करण्यापेक्षा प्रतिबंध आणि संरक्षण करणे चांगले आहे आणि आज मी तुम्हाला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.'