मलायका अरोरा- अरबाज खान यांनी १८ वर्षांचा संसार मोडत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. ज्या दिवशी दोघांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली होती तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला होता. मात्र घटस्फोटाआधी आणि नंतर दोघांनीही घटस्फोट का झाला याबद्दल कुठेच वाच्यता केली नाही.
आता घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदा मलायकाने आपलं मन मोकळं केलं. करिना कपूर खानच्या रेडिओ चॅट शोवर बोलताना मलायकाने घटस्फोटाच्या आदल्या रात्री काय झालं तो किस्सा सांगितला.
मलायकाने करिनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, ‘जेव्हा माझ्या घटस्फोटाबद्दल मी मित्र- परिवाराशी बोलले तेव्हा सगळ्यांनी मला पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितलं. ज्या व्यक्तींचं माझ्यावर प्रेम आहे, ज्यांना माझी काळजी आहे ती प्रत्येक व्यक्ती मला असाच सल्ला देणार याची मला कल्पना होती. कोणीही मला उत्स्फूर्तपणे हा घे घटस्फोट.. फार विचार करू नकोस असं म्हणणार नव्हतं.’
मलायका म्हणाली की, ‘घटस्फोटाच्या आदल्या रात्री मी माझ्या कुटुंबासोबत बसले होते. सगळ्यांनी मला पुन्हा एकदा विचार करायला सांगितलं. जर तुझा हा अंतिम निर्णय असेल तर आम्हाला तुझा अभिमान आहे. आमच्या दृष्टीने तू एक कणखर महिला आहेस.’
करिनाने यानंतर मलायकाला प्रश्न विचारला की, नातं तुटल्यावर कसं वाटतं? दुसरं नातं जोडलं जाऊ शकतं का? याचं उत्तर देताना मलायका म्हणाला की, ‘हो का नाही... पहिलं नातं संपल्यावर पुढे जाणं फार आवश्यक असतं. तुम्हाला तुमचा वेळ मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा बेड कोणासोबत शेअर करावा लागत नाही.’
मलायका पुढे म्हणाली की, ‘तुम्ही पुन्हा प्रेमात पडू शकता. तुम्ही आता काहीही करू शकता ही एक वेगळी भावना असते. टिंडरवर अकाऊंट सुरू करून, सोशल मीडिया फोटो अपलोड करता. पुन्हा एकदा नव्या अंदाजात आयुष्य जगता.’
घटस्फोटाबद्दल बोलताना अरबाज म्हणाला होता की, ‘कित्येक वर्ष मी हे नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मला फारसं यश आलं नाही. ठीक आहे... अनेकदा लोक नात्यात एवढा प्रयत्नही करत नाहीत.’
‘आयुष्यात अनेक लोक नात्यासाठी आणि लग्नासाठी तडजोडी करतात. या तडजोडी करताना आपण हे निभावून नेऊ शकतो असा विश्वास त्यांच्यात असणं फार आवश्यक आहे. मात्र अनेकदा लोकांना जास्तीची अपेक्षाही असते. मी आनंदी आहे.’
मलायकाचं सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटाचं कारण अर्जुन कपूर असल्याचं म्हटलं आहे.