रामायणच्या रि-टेलिकास्टच्या यशानंतर डीडी नॅशनलवर महाभारतचं सुद्धा रि-टेलिकास्ट सुरू झालं आहे. अशात आता महाभारतात गांधारीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेणुका इसराणी हिची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
महाभारतमध्ये रेणुका यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलेली असली तरीही त्यांची ओळख लोकांपासून कधीच लपली नाही. जेव्हा या शोमध्ये काम केलं त्यावेळी त्या अवघ्या 22 वर्षांच्या होत्या.
रेणुका यांना त्यावेळी अभिनय क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं, 'महाभारत'ने त्यांना ते यश दिलं जे त्यांना पहिल्यापासून हवं होतं.
रेणुका यांचं शिक्षण राजस्थानची राजधानी जयपूरच्या महाराणी कॉलेजमधून झालं. पण फार कमी लोकांनी माहित आहे की त्या कॉलेजमध्ये असताना ऑल राउंडर गोल्ड मेडलिस्ट होत्या. याशिवाय थिएटरमध्येही त्यांना अनेक अवॉर्ड मिळाले आहेत.
विशेष म्हणजे त्यांनी महाभारतमध्ये पहिल्यांदाच गांधारीची भूमिका साकारली नव्हती. त्यांनी एका मणिपुरी स्टाइलमध्ये अंधाधुन नावाचं नाटक केलं होतं. ज्यात त्यांनी गांधारीची भूमिका साकारली होती त्यामुळे ही भूमिका त्यांच्या ओळखीची होती.
डोळ्यांवर पट्टी बांधून चेहऱ्यावर भाव दाखवणं खरं तर कठीण काम आहे. रेणुका सांगतात ही भूमिका थोडी कठीण होती मात्र मला आनंद आहे की अशी भूमिका मी वयाच्या 22 व्या वर्षी साकारली होती.
याशिवाय रेणुका 'बडे अच्छे लगते है' या हिंदी मालिकेतही दिसल्या होत्या आणि या शो दरम्यान अभिनेत्री साक्षी तन्वरसोबत त्यांचं खूप चांगलं बॉन्डिंग सुद्धा होतं.