वयाच्या 19 व्या वर्षापासूनच बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री दिव्या भारती यांच्या मृत्यूला बरीच वर्ष लोटली. मात्र आजही त्या लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. जेवढ्या वेगानं त्यांना यश मिळालं, त्यांच्या निधनाच्या वृत्तानं देशाला तेवढंच सुन्न करून सोडलं होतं.
दिव्या भारती यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 मध्ये झाला होता. एकेकाळची टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्या यांना कधीच अभिनय क्षेत्रात यायचं नव्हतं. फक्त शिक्षणापासून वाचण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला होता. त्यावेळी त्यांना अनेक सिनेमांसाठी साइन केलं गेलं आणि ऐनवेळी काढूनही टाकण्यात आलं.
मुंबईला आल्यावर त्या एका साउथ प्रोड्युसरला भेटल्या. त्यावेळी त्यांना आपल्याला सिनेमात काम मिळू शकतं यावर अजिबात विश्वास नव्हता. जेव्हा त्यांना प्रोड्युसरनं हैदराबादला शूटिंगसाठी बोलवलं त्यावेळी त्या फक्त फिरायला गेल्या होत्या. पण तिथे शूटिंग सुरू झालेलं पाहून त्या हैराण झाल्या.
पहिला तमिळ सिनेमा ‘बोब्बिली राजा’च्या वेळी जेव्हा दिव्या यांना साइनिंग अमाउंट विचारण्यात आली त्यावेळी त्यांना साइनिंग अमाउंट काय असते हे देखील माहीत नव्हतं. त्यांचा भोळेपणा पाहून प्रोड्युसर सुद्धा हैराण झाले. या सिनेमानंतर दिव्या यांना बॉलिवूडमध्ये ऑफर मिळू लागल्या.
19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या दिव्या फार कमी वेळातच तरुणांच्या मनावर राज्य करु लागल्या. त्यांचं सौंदर्य, अभिनय आणि निरागसता याचे लोक दिवाने झाले.
दिव्या भारती यांचं करिअर चांगलं चाललं होतं. 1992 मध्ये आलेला त्यांच्या ‘दिवाना’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.
त्यानंतर काही दिवसांतच आलेल्या त्यांच्या निधनाच्या वृत्तानं सर्वांनाच हादरवून सोडलं. स्वतःच्याच घरातून पडून दिव्या भारती यांचा रहस्यमय मृत्यू झाला होता. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये दारुच्या नशेत त्या बाल्कनीतून पडल्याचं म्हटलं गेलं होतं.
काही लोकांनी दिव्या यांच्या मृत्यूसाठी त्यांचा पती साजिद यांनाही जबाबदार धरलं होतं. साजिदनं दिव्या यांना मारलं असं म्हटलं जात होतं.
मात्र दिव्या यांना मृत्यू ही हत्या की आत्महत्या हे आजपर्यंत सर्वांसमोर रहस्य बनून राहिलं आहे. जे अद्याप उलगडलेलं नाही.