पंढरपूर, 18 जून : बहिणीच्या लग्नानंतर क्षुल्लक कारणावरून भावाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे. लग्नात आपल्या मनासारखी कपडे घेतली नसल्याचा राग मनात धरून भावाने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. मंगळवेढा तालुक्यात डोंगरगाव येथील ही घटना असून निलेश दत्तात्रय हेंबाडे (वय 19) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
निलेश दत्तात्रय हेंबाडे या तरुणाच्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले. मात्र या लग्नात आपल्याला आवडणारे कपडे घ्यावेत, असा निलेशचा हट्टा होता. तो हट्ट त्याचे आई-वडील पूर्ण करू शकले नाहीत. याच कारणावरून रागावलेल्या निलेशने टोकाचा निर्णय घेतला आणि त्याच्या घराशेजारी असणाऱ्या शफोद्दीन इनामदार या शेतकऱ्याच्या शेतात असणाऱ्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा - प्रशिक्षण काळातच पथकावर झाला होता हल्ला...डॅशिंग IPS अधिकारी ऐश्वर्या शर्मांची कहाणी
दरम्यान, या घटनेबाबत त्याच्या नातेवाईकांना सुनील संजय डोंगरे यांनी माहिती दिली. या धक्कादायक घटनेबाबत कळताच निलेशच्या आई-वडिलांनी जीवाच्या आकांताने शेताकडे धाव घेतली आणि त्याचा गळफास सोडवला. तसंच उपचारासाठी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले.
संपादन - अक्षय शितोळे