अकोला, 14 फेब्रुवारी : जम्मू-काश्मिर येथील पुलवामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 2019 रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) 41 जवान शहीद झाले होते. यावेळी सरकारने शहीद झालेल्या जवानांना मदतीची घोषणा केली होती. मात्र दुर्देवाने ही घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे. सरकारला या घोषणांचा विसर पडला आहे. आज या घटनेला वर्ष पूर्ण झाले तरी शहिदांच्या कुटुंबीयांना मदत मिळू शकलेली नाही. 'लोकसत्ता' वृत्तपत्राने दिलेल्या बातमीतून ही माहिती समोर आली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 41 जवान शहीद झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजयसिंह मिकमसिंह राजपूर (45), लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड (37) या दोघांना वीरमरण आलं. जेव्हा ही दुर्देवी घटना घडली तेव्हा राजकीय पुढारी व मंत्र्यांची रांग या कुटुंबीयांच्या घरासमोर लागली होती. मात्र अद्यापही एकाकडूही त्यांना मदत मिळालेली नाही. पुलवामाच्या शहिदांना पेट्रोल पंप, गॅस एजन्सी देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आलेलं नाही. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुलवामा शहिदांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत जाहीर केली होती. दुसऱ्या दिवशी त्या मदतीचा धानदेश कुटुंबीयांना देण्यात आला. मात्र याव्यतिरिक्त इतर कोणतीही मदत कुटुंबीयांना मिळालेली नाही.
बुलढाण्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलातील शहिदांना राज्य सरकारकडून 5 एकर जमीन, तसंच इतर मदत मिळाली नाही. आर्थिक मदत देणाऱ्या सामाजिक संस्थांनीही या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं आहे.
जैश-ए-मोहम्मदचा 24 वर्षांचा दहशतवादी मुदसिर अहमद खान याने पुलवामा हल्ल्याची योजना आखली होती. तो व्यवसायाने इलेक्ट्रिशयन होता. 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात 41 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. मुदस्सिरने आत्मघाती हल्ला घडवण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन आणि स्फोटके मिळवून दिली होती. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेला आज एकवर्ष पूर्ण झाले. वर्षभरापूर्वीच्या या दिवसाचा इतिहास जम्मू-काश्मीरमधील एक अतिशय दुःखद घटना म्हणून नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा दहशतवादी हल्ल्यात (Pulwama Terror Attack)शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 41 जवानांच्या स्मृतीस्थानी बांधलेल्या स्मारकाचे शुक्रवारी लेथपुरा कॅम्पमध्ये उद्घाटन होणार आहे.
अखेर विजय माल्ल्याने भारतासमोर जोडले हात, बॅंकाना केली विनंती...