लडाखमध्ये चीन सोबतचा तणाव कायम आहे (India-China Ladakh Border Tension). भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना रोखून धरण्यात यश मिळवलं असून त्यांच्या मुजोरीला मोठा दणका दिला आहे. चीनचं संकट कायम असताना लष्करापुढे आता दुसरं संकट निर्माण झालं आहे.
हे संकट नैसर्गिक असून त्याचा लष्कर समर्थपणे मुकाबलाही करत आहे. लडाख आणि परिसरात आता बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. तापमान -20 डिग्री एवढं असून हाडं गोठविणाऱ्या या थंडाचा मुकाबला करण्यासाठी सैनिक सज्ज झाले आहेत.
या भागातल्या उचं टेकड्यांवर तर तापमान हे -40 पर्यंतही जात असतं. यावेळी तणावामुळे भारताने जास्तीचे सैनिक तैनात केले आहेत. या भागात तब्बल 50 हजार सैनिक तैनात असल्याची माहितीही देण्यात आलीय. नोव्हेंबर नंतर या भागात तब्बल 40 फुटांपर्यंत बर्फ जमा होत असतो.
त्यामुळे इथे तैनात असलेल्या सैनिकांची कसोटी लागत असते. अशा वातावरणात काम करणं हे सर्वात कठिण काम असतं. त्यामुळे लडाखमध्ये 15 दिवसांत सैनिकांची ड्युटी बदलली जात आहे.
इथे राहणाऱ्या सैनिकांसाठी लष्कराने खास घरं तयार केली आहेत. ही घरं थंडीतही उबदार राहू शकतात. त्यामुळे या घरांची निर्मिती करण्यात आली आहे.
सैनिकांना दीर्घकाळ या भागात राहावं लागणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. हिमवर्षाव झाला तरी या घरांवर त्याचा परिणाम होणार नाही.
हिटर आणि इतर सुविधांनी ही घरं सज्ज असून त्यातून त्यात बेड्स आणि कपाटं ठेवण्यात आली आहेत. सैनिकांना यासुविधांचा मोठा फायदा होणार आहे.
या भागात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बोअरवेल्सही खोदण्यात आल्या आहे. त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा करणं सोपं जाणार आहे.