नवी दिल्ली, 21 एप्रिल : कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत. आतापर्यंत रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पलीकडे गेली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांचा आकडा 18601 इतका आहे. या व्यतिरिक्त 590 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना रूग्णांची संख्या 17656 होती. त्याच वेळी, तोपर्यंत 559 लोकांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या मागील आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोना संसर्ग होण्याच्या नवीन प्रकरणांमध्ये 1336 रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. तर दिलासादायक बातमी अशी की उपचारानंतर 3252 लोक बरे झाले आहेत. निरोगी लोकांची संख्याही सतत वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये मृतांच्या आकड्यांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या दिवसभरात 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत हा मृतांचा सगळ्यात जास्त आकडा समोर आला आहे. ही खरंतर सरकारची चिंता वाढवणारी बाब आहे.
- आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 18 हजार पेक्षा अधिक रुग्णांची चाचणी सकारात्मक आली आहे. - राष्ट्रपती भवनात कोरोनाचा प्रकार घडल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने 125 कुटुंबांना सक्तीने क्वारंटाईन ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एखाद्या भागात कोरोनाचा एकाही रुग्ण आढळल्यास, खबरदारी म्हणून संपूर्ण प्रदेशातील लोकांना तो अलग ठेवणे आवश्यक आहे. - जगभरात या विषाणूमुळे 1,65,739 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 24 लाख लोक संक्रमित आहेत. बहुतेक मृत्यू युरोपमध्ये झाले आहेत. उत्तर अमेरिकेत 43,369, आशियात 14,840, दक्षिण अमेरिकेत 3,850, आफ्रिकेत 1,128 आणि ऑस्ट्रेलियामध्ये 83 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये युरोपियन देशांमध्ये सर्वाधिक 23,660 जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यानंतर स्पेनमध्ये 20,852 मृत्यू, फ्रान्समध्ये 19,718, ब्रिटनमध्ये 16,060, बेल्जियममध्ये 5,828 आणि जर्मनीत 4,642 मृत्यू झाले. - दक्षिण कोरियामध्ये 13 नवीन घटना समोर आल्या आहेत. हा सलग 19 वा दिवस आहे जेव्हा देशात दररोज नवीन नवीन प्रकरणांची नोंद 100 च्या खाली होत आहे. सोमवारच्या आकडेवारीनुसार, देशातील 10,674 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यातून 236 लोक मरण पावले आहेत. नवीन प्रकरणे कमी झाल्यानंतर सामाजिक अंतर मार्गदर्शक तत्त्वे शिथिल केल्या आहेत. संपादन - रेणुका धायबर