नवी दिल्ली, 13 जून : कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशात हाहाकार पसरला आहे. यामध्ये आता आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोरोनाच्या (Coronavirus) लक्षणांसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. वास घेण्याची क्षमता कमी होणं आणि चव गमावणं अशी लक्षण दिसल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे. देशात सध्या कोरोना चाचणी घेण्याच्या संदर्भात 13 क्लिनिकल सिस्टम आहेत, त्यात या नव्या लक्षणांची नोंद करण्यात आली आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेतांना त्रास होणे, अशक्तपणा ही कोरोनाची सर्वसाधारण लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळली तर तातडीने डॉक्टरांकडे जायचा सल्ला दिला जातो. नंतर तोंडाची चव जाणे आणि कुठलाही वास यायचा बंद होतो अशीही लक्षणे आढळली होती. आता मुंबईतल्या अनेक रुग्णांना गॅस्ट्रोसारखी लक्षणेही आढळून आल्याचं पुढे आलं आहे. पावसाला सुरुवात झाली की दरवर्षी साथीचे आजारही डोके वर काढत असतात. सर्दी, खोकला, ताप, हे कॉमन आजार आहेत. त्यात गॅस्ट्रो आणि डेंग्युची साथही येत असते. अशा परिस्थितीत आता कोरोनाही आल्याने जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना झालेल्या अनेक रुग्णांना पोट बिघडणं, थकवा येणं अशीही लक्षणं दिसून येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे निष्काळजीपणा न करता अशी काही लक्षणे आढळली तर तातडीने डॉक्टरांना दाखवा असा सल्लाही दिला जातोय. दरम्यान, राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त 2200 रुपये इतका दर आकारला जाणार आहे. तर रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत केली होती. समितीने शासनाला अहवाला सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दरनिश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.