06 सप्टेंबर : आपल्या देशात दर वर्षी कोणत्या न कोणत्या राज्यात निवडणुकीचा फीव्हर असतो. लोकसभा निवडणुका वेगळ्याच. ही प्रथा बंद करून देशभरात एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका घ्यायचा प्रस्ताव समोर येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल संकल्पना मांडली आहे. याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पाठिंबा दिलाय.
‘नेटवर्क 18’ ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्याची आयडिया बोलून दाखवली होती. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या निवडणुकांमधून देशाला बाहेर काढा अशी विनंती अनेक राजकीय पक्षांनी माझ्याकडे बोलून दाखवली होती. त्यामुळे एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घ्यावी असा विचार आला. 10 दिवसांत निवडणूक झाल्यातर पुढील पाच वर्ष कारभार सुरळीत चालेल. पण, हे एका पक्षाचे काम नाहीये. याला सर्व पक्षांचा पाठिंबा असायला हवाय. निवडणूक आयोगाच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र आले तर हे शक्य होऊ शकते असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. आता याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पाठिंबा दर्शवलाय. आचारसंहितेमध्ये आता बदल झाला पाहिजे. एकत्र निवडणूक पद्धतीचा सर्व पक्षांनी विचार करायला हवा असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
तसंच काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीही याला पसंती दाखवलीय. पण डाव्या पक्षांचा मात्र विरोध आहे. केंद्र सरकारची धोरणं राबवणं, योजनांअंतर्गत निधी राज्यांना वाटप करणं सोपं जावं, हे यामागचं एक कारण आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv