19 डिसेंबर : महाराष्ट्राला भाजपच्या व्हिजनची गरज नाही शिवरायांच्या आणि शिवसेनाप्रमुखांचं व्हिजन महाराष्ट्राला पुरेसं आहे असं म्हणत सामनातून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य करण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तशा राज्यातील राजकारणही चांगलचं तापू लागलं आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य करत ‘भाजपचे मुंबईच्या विकासंदर्भातील व्हिजन शिवसेनेला मान्य असेल तरच आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची युती होईल’, असं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्याचा सामनातून आज यथेच्छ समाचार घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री नागपुरात ‘व्हिजनवाद’चा नवा अर्थ समजावून सांगत असतानाच कश्मीरात लष्कराच्या काफिल्यावर भयंकर आतंकवादी हल्ला झाला आणि त्यात तीन जवान शहीद झाले. ‘नोटाबंदी’नंतर देशातील आतंकवाद नष्ट होईल असं ‘व्हिजन’ होते. त्या व्हिजनचं काय होत आहे ते रोजच दिसते. वा रे तुमचे विकासाचे व्हिजन! हा जो काही तुमचा व्हिजनचा ढोल आहे तो सध्यातरी तुमच्याकडेच ठेवा. निदान शिवरायांच्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या महाराष्ट्राला अशा व्हिजनची गरज नाही असं सामनात म्हटलं आहे.
भाजपचा दिल्ली आणि इतर राज्यांतील कारभार हा ‘व्हिजन’वादीच आहे व त्याबद्दल आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही. महाराष्ट्रातील गुन्हेगारी साफ घटल्याचे मुख्यमंत्री सांगत असतानाच प्रत्यक्ष नागपुरात २० तासांत चार निर्घृण हत्या झाल्या आहेत. पण कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कमालीचे व्हिजन असल्याने ‘हत्या’ नसून या मंडळींनी शांतचित्ताने समाधी घेतली असे आता पत्रकारांनी लिहायला हवे असा टोला उद्धव ठाकरेंनी मारला आहे. त्याचबरोबर, नोटबंदीसह मंत्रालयातील व्यवहार कासवगतीने होत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनाही या संपादकियातून खडेबोल सुनावण्यात आलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

)







