08 फेब्रुवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवारी) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात म्हणजे गुजरातमध्ये जाऊन सभा घेतली आणि मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट हल्लाबोल केला.
संघाच्या विषारी विचारधारेमुळेच गांधीजींची हत्या झाली, असं राहुल म्हणाले. नरेंद्र मोदींनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या आदर्शांचा अभ्यासच केला नाही. त्यांचं आयुष्य संघात गेलं आणि ते पटेलांचे पुतळे बांधण्याचं नाटक करत आहे अशी थेट टीकाही राहुल यांनी मोदींवर केली.
यानंतर राहुल यांनी गुजरातच्या विकासाचा समाचार घेतला. गुजरातमधील सरकार गरिबांसाठी नाही तर श्रीमंतांसाठी आहे. मुळात गुजरातचा विकास हा एका व्यक्तीमुळे झाला नसून तो जनतेमुळे झाला आहे. जनतेच्या हातात ताकद आहे. पण विकासाचे दावे करून मोदी लोकांना मूर्ख बनवत आहे असा आरोपही राहुल यांनी केला.
गुजरातमध्ये आदिवासी मृत्युमुखी पडत आहे पण तरीही येथील सरकार काहीही करत नाही. मोदी जिथे जाता तिथे विकासाचा पाढा वाचतात पण गुजरातमधील खरी परिस्थिती सांगत नाही. आम्ही गरिबी हटवण्याची मागणी करतो तर मोदी सरकार गरीबच हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुजरातमध्ये 6 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्यात पण ही गोष्ट पुञे येऊ दिली नाही. मोदींना महात्मा गांधी आणि पटेल यांची विचारधारा माहिती नाही त्यामुळे राजकीय फायद्यासाठी ते पटेल यांची मूर्ती बनवत आहे अशी टीकाही राहुल यांनी केली.