26 नोव्हेंबर
लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं आज दुदैर्वी निधन झालं. नागपूरमध्ये बुद्ध टीव्ही वाहिनीच्या उद्घाटन कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांनी रंगमंचावरच अखेरचा श्वास घेतला. स्टेजवर जय भीम म्हणतच त्यांनी आपला देह ठेवला. 1000 हून अधिक गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांच्या भारुडाचे आजपर्यंत पाचशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. याशिवाय गोंधळ आणि ठुमरी हे प्रकारही त्यांनी सादर केले आहेत.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठल गंगाधर उमप यांचा जन्म 1931 साली नायगाव मुंबई येथे झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. लोकशाहीर क्षेत्रात त्यांनी त्यामानाने ब-या च उशिरा म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षी आपले पाऊल टाकले.
लोकशाहीरीच्या शिक्षणाचे धडे त्यांनी सदाशिव गुजरांकडे गिरवले. वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा विठ्ठल उमप गायन, अभिनय आणि शब्दरचनाकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नवनवीन प्रयोग करत होते. शाहीर विठ्ठल उमप यांनी अबक दुबक तिबक, गाढवाचं लगीन, अरेरे संसार संसार, मातीचे स्वप्न आणि जांभुळ आख्यान यासारख्या लोकप्रिय नाटकांमध्ये काम केले होते.
त्यांनी लोकनाट्याचे जवळपास 500 प्रयोग केले होते.1960 सालापासून ऑल इंडिया रेडिओ आणि दुरदर्शनवरील कार्यक्रमांतून विठ्ठल उमपांनी आपल्या शाहिरी कलेद्वारे लोकांमध्ये सामाजिक आणि आरोग्य या विषयांवर जागृती केली. विठ्ठल उमप हे दुरर्शनवरील अनेक मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते आणि गायक होते. त्यांनी जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ.बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटासाठी गाणी लिहीली. खुप काळ प्रेक्षकांची पसंती मिळवणा-या भारत एक खोज या कार्यक्रमात त्यांचा आवाज प्रेक्षकांनी ऐकला होता.
शाहीर विठ्ठल उमप हे तमाशा, शाहीर, लोककल्याण या महाराष्ट्र शासनाच्या योजनेबरोबरच, अखिल भारतीय शाहीर परिषद आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये कार्यरत होते.महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार शाहीर विठ्ठल उमप यांना त्यांच्या लोककलेतील योगदानाबद्दल 1997 साली देण्यात आला.त्यांना देशात आणि परदेशात अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. महाराष्ट्रातील लोकशाहीरी कलेतील कार्याबद्दल त्यांना 2009 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला.

)







