29 जानेवारी : राज्यभरात मनसेच्या टोलविरोधी राडा करणार्या राज ठाकरे यांच्यावर आज ‘सामना’ या वृत्तपत्रात बोचरी टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकांची चाहूल लागल्यानेच झोपी गेलेले पक्ष जागे झाल्याचं आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या टोलनाक्याविरोधातल आंदोलनाला लक्ष्य करत, ‘शिवसेना-भाजप टोल संपवण्यासाठी वचनबद्ध आहेत. पण यानिमित्ताने आहे झोपी गेलेले जागे झाले व त्यांनी रात्रीच्या काळोखात टोलनाके फोडले. जनतेला त्यांचे ढोंग कळले आहे. राजकारणात हवशे, नवशे आणि पावशेही आहेत. मात्र त्यांच्याकडे लक्ष न दिलेलेच चांगले टोलनाक्यांवर जे राडे झाले आहेत त्या मागे फक्त उद्याच्या येणार्या निवडणुका हाच एकमेव उद्देश आहे.’ असं ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी एका सभेत बोलताना मनसे कार्यकर्त्यांना टोल न भरण्याचे आदेश दिले होते. तसचं कोणी अडविल्यास त्यांना तुडवून टाका असंही म्हटले होते. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रातल्या बर्याचं टोलनाक्यांची मनसैनिकांनी तोडफाड केली होती.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर भाषण दिल्याच्या आरोपांवरून पुणे जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. पुण्यातील राजगड आणि लोणी काळभोर इथं गुन्हे दाखल करण्यात आलेत. पण पोलीस राज ठाकरेंवर कधी आणि काय कारवाई करणार याबाबत मात्र बोलायला पोलीस तयार नाहीत.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पुणे दौर्यावर येणार आहेत. त्यामुळे आत पोलीस कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, पुणे-सातारा रोडवरील रिलायन्स इन्फ्रास्टक्चर ऑफिस तोडफोड प्रकरणी मनसेच्या 7 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.