****11 मार्च : नितीन गडकरी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला धारेवर धरत खडा सवाल उपस्थित केलाय. उद्धव यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे. मात्र उद्धव यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना अजून यश आले नाही.
त्यामुळे नाराज उद्धव यांनी थेट भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि आपली नाराजी व्यक्त केलीय. मनसेशी वाढत्या सलगीबाबत उद्धव ठाकरेंनी मोदी यांच्याशी चर्चा केली असल्याचं कळतंय.
दरम्यान, या अगोदर संध्याकाळी महाराष्ट्र भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. रुडी यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून गैरसमज दूर झाले आहे असं रुडी यांनी स्पष्ट केलं. तसंच उद्धव यांच्या राज्यात भाजपला अधिकार कुणाला ? असा प्रश्न विचारला होता. यासाठी राज्यात देवेंद्र फडणवीसच भाजपचे नेते असतील असं उत्तर रुडी यांनी दिलंय.
भाजप आणि मनसेच्या जवळकीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे त्यांनी आज (मंगळवारी) आपल्या शिलेदारांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली. भाजपमध्ये राज्यात चर्चा करण्याचे आणि निर्णय घेण्याचे अधिकार कुणाला आहेत, हे भाजपनं स्पष्ट करावं असा सवाल उद्धव यांनी विचारला. भाजप कुणाचाही पाठिंबा घ्यायला तयार आहे का, असंही त्यांनी विचारलं.
भाजपनं या प्रश्नांची तातडीनं उत्तर द्यावीत आणि कार्यकर्त्यांमधलं संभ्रमाचं वातावरण दूर करावं, असंही उद्धव ठाकरेंनी बजावलंय. याचवेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नाव न घेता फटकारलं. मोदींचा मुखवटा घालून मतं मागितली जात आहे अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी मनसेवर केलीय.