विवेक कुलकर्णी, मुंबई
20 फेब्रुवारी : खरंतर कोणत्याही निवडणुकीत विरोधक काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असत. मुंबई महापालिका निवडणुकीत मात्र कॉग्रेस पक्ष अंतर्गत वादाकरताच जास्त चर्चेत राहिला. पक्षाचे नेते पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारात उतरले आहेत का हा प्रश्न प्रचार संपल्यानंतर कायम राहिला आहे.
मुंबईत एकीकडे भाजपा आणि शिवसेनेनं प्रचाराचा धुराळा उडवला असताना मुंबई काँग्रेस प्रचारात नेमकं कुठे आहे असा प्रश्न मुंबईकरांना पडला होता. काँग्रेसच्या नेत्यांचे आपापसतले वादच या पूर्ण निवडणुकीदरम्यान गाजत राहिले. त्याचा परिणाम काँग्रेसच्या प्रचारावर स्पष्टपणे जाणवला. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मुंबईतील प्रचाराकडे दुर्लक्ष केलेलं असताना निरुपम यांनी मुंबईत फक्त १२च सभा घेतल्या. लोकांशी थेट संवाद साधण्यापेक्षा पक्षाच्या दिल्लीतून आलेल्या पी. चिदंबरम, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंग यांसारख्या नेत्यांच्या सोबत त्यांची मर्जीच जास्त सांभाळली अशी चर्चा पक्षात सुरु होती. अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही मुंबई विमानतळाशी असलेल्या टॅक्सी चालकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत निरुपम दिसले. पण प्रचाराच्या काळादरम्यान निरुपम मात्र आपण सत्तेवर येणार यावर ठाम होते. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांसाठी राज्य पिंजून काढत गेल्या 15 दिवसात 61 सभा घेतल्या. पण मुंबईत मात्र पक्षाचे नेते 21 फेब्रुवारीनंतर एकमेकांशयीचा संताप व्यक्त करणार असा इशारा देत होते. खरतंर गटबाजी काँग्रेस पक्षाला नवी नाही. पण नेत्यांचे आपापसातले वाद आणि अनास्था या निवडणुकीत पक्षाच्या मुळावर येणार नाही ना असाच प्रश्न आता विचारला जातोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
51