बंगलोर, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकी चं चित्र स्पष्ट झालं असून काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं आहे. काँग्रेसला 136 जागांवर विजय मिळाला आहे. तर, भाजप 65 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणं काँग्रेस हायकमांडसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. कर्नाटकमध्ये ऐतिहासिक कामगिरीनंतर काँग्रेससमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यातून कुणाची निवड करायची? हा संघर्षाचा मुद्दा असणार आहे. सिद्धरामय्या अनुभवी आहेत. त्यांच्याकडे सरकार चालविण्याचाही अनुभव आहे. सिद्धरामय्या 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. तर डी. के. शिवकुमार आव्हान स्वीकारणारे नेते आहेत. तसंच सोनिया गांधी यांची मर्जी राखणारे नेते असल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जातं आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र, आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिलेले काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांचंही नावही समोर येऊ शकतं. नावावर सहमती झाल्यास खरगे यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छापूर्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटकात विविध मंत्रिपदे, केंद्रात मंत्रिपद, लोकसभेचे गटनेतेपद अशी विविध पद खरगे यांनी भुषवली आहेत. आता काँग्रेस हायकमांड कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. वाचा - Karnataka Election : कर्नाटक निकालानंतर महाराष्ट्रात घडामोडींना वेग; ठाकरे गटाची खलबतं काय म्हणाले मल्लिकार्जून खरगे ? मुख्यमंत्री कोण असेल यासाठी आमच्या पक्षात एक प्रक्रिया असते. कोणत्याही राज्यात निवडणूक झाल्यावर आम्ही त्या प्रक्रियेनुसार काम करतो आणि निर्णय प्रक्रिया होते. त्यानुसार आमदारांची बैठक बोलावली जाईल. केंद्रातून निरीक्षक बैठकीत भाग घेतात. बैठकीमधील निर्णय पक्षश्रेष्ठींना सांगितला जातो. राहुल गांधी आणि माझ्यासह बाकीचे नेते यावर चर्चा करतात. सर्व लोक मिळून त्यावर योग्य तो निर्णय घेतो. मुख्यमंत्री कोण असेल, यावर लगेच निर्णय घेतला जाणार नाही, असं मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलंय. भारत जोडो यात्रा यात्रेचं यश कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाचे मोठे श्रेय काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रे’ला दिले आहे. ‘भारत जोडो यात्रा विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या द्वंद्वात राहुल गांधींनी काढलेली पदयात्रा ‘स्पष्ट विजयी’ ठरल्याचे पक्षाने म्हटले आहे. ‘भारत जोडो यात्रा’ पार पडलेल्या 20 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने 15, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) 3 आणि भारतीय जनता पक्षाने 2 जागा जिंकल्या. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत या 20 जागांपैकी काँग्रेसला फक्त 5 जागा मिळाल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.