20 वर्षांपूर्वी भारताच्या ताब्यात असलेल्या या क्रूर दहशतवाद्याला सोडून द्यावं लागलं होतं. कारण होतं कंदाहार विमान अपहरणाचं.
ओलीस धरलेल्या प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात मसूर अझहरसह 3 कट्टर म्होरके सोडण्याची मागणी दहशतवाद्यांनी केली होती. अपहृत विमानात 168 प्रवासी होते आणि त्यांच्या सुटकेसाठी दबाव वाढल्यानं तत्कालीन भारत सरकारने मसूद अझरसह दोघांना सोडलं होतं. त्यानंतर आत्ता पुलावामा हल्ल्यापर्यंत हा दहशतवादी भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरला होता.
डिसेंबर 2001मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला. तेव्हा अफजल गुरू आणि लष्कर ए तैय्यबासोबत जैशचाही होता हात. ऑक्टोबर 2001 जम्मू काश्मीर विधानसभेवर आत्मघातकी हल्ला केला होता.
क्रूरकर्मा मसूर अझहरला 1999मध्ये कंदाहार विमान अपहरणानंतर सोडण्यात आलं, तेव्हापासून जैशची ताकद वाढली होती. काश्मीरमध्ये सतत हिंसाचार घडवून आणण्यात त्याचा मोठा भाग होता.
इ.स.2000 मध्ये जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली आणि स्वतःला मौलाना म्हणवून घेणाऱ्या मसूद अझहरने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले.
काश्मिरी मुस्लीम लोकांना मदत म्हणून आमची संघटना काम करते असा या मसूदचा दावा होता. स्थापनेनंतर दोन महिन्यात जैश-ए-मोहम्मदने श्रीनगरमधील बदामीबाग येथे लष्कराच्या मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला केला होता. त्यानंतर लगेच जम्मू काश्मीरमधील सचिवालयाच्या इमारतीवर हल्ला केला होता.
पुलावामामध्ये 14 फेब्रुवारीला CRPF च्या ताफ्यावर मोठा हल्ला केला गेला. त्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने स्वीकारली होती.
जैश ए मोहम्मदला भारत, ब्रिटन, अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रसंघानेही दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकलं आहे. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने 2002 मध्ये त्यांच्यावर बंदी घातली होती. मात्र तरीही संघटनेचा प्रमुख मसूद अजहर पाकिस्तानातील पंजाब प्रांतात राहत असल्याचंही बोललं जात होतं.
भारतविरोधी चिथावणीखोर भाषणं देत तरुणांना जिहादी कारवायांमध्ये ओढून घेण्यात मसूद अझहर तरबेज होता. जैश ए मोहम्मदमध्ये सामील होणाऱ्यांमध्ये अनेक अल्पवयीन तरुणसुद्धा होते.
वयाच्या 22 व्या वर्षीपासूनच भारतद्वेष आणि दहशतवादाचं विष डोक्यात होतं. अखेर वयाच्या 51 व्या वर्षी पाकिस्तानात इल्सामाबादच्या रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. तो काही दिवस कर्करोगाने आजारी होता, असं सांगतात.
काश्मीर खोऱ्यात अशांतता राहावी यासाठी हा मौलाना सतत कारवाया करत होता. 1994 ला काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हरकत-उल-मुजाहिद्दीन चा सदस्य असल्याच्या कारणावरुन अजहर मसूदला अटक केली होती. त्याला सोडवण्यासाठी विमान अपहरण करण्यात आलं.
पुलावामा हल्ल्यासाठी आदिल अहमद दारसारख्या मुलांना आत्मघातकी हल्ल्यासाठी प्रवृत्त करायचं काम जैशचा म्होरक्या म्हणून मसूर अझहर करत असे.
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावरही जैश ए मोहम्मदने हल्ल्याचा प्रयत्न केला होता.