शत्रू देशांचे उपग्रह निकामी करणारं तंत्रज्ञान - शत्रू राष्ट्रांनी उपग्रहाद्वारे भारतावर लक्ष ठेवून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास अथवा आपल्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर तो उपग्रह निकामी करणारं तंत्रज्ञान भारताकडे आहे.
स्फोटक क्षेपणास्त्र अंतराळात पाठवणं हे मोठं आव्हान आहे. याचं कारण असं की पृथ्वीच्या 300 किमी कक्षेत क्षेपणास्त्र आलं तर त्याला तिथल्या वातावरणाचा विरोध होऊ शकतो आणि क्षेपणास्त्र जमिनीवर कोसळण्याची भीती आहे.
क्षेपणास्त्राचं जितकं जास्त वजन तेवढं मोठं आव्हान आहे. अंतराळात क्षेपणास्त्र जास्त वजनाचं असेल तर त्याचा वेग आणि वेळ दोन्ही अचूक साधणं अधिक जोखमीचं असतं. अंतराळात उपग्रहांचा वेग 5-7.5 किमी प्रति सेकंद साधारण असतो. त्यामुळे जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राकडून उपग्रहाचा अचूक वेळेत निशाणा साधणं महत्त्वाचं आहे.
अँटी-सॅटेलाईट मिसाईलचा प्रवास 200-800 किमी आहे. जमिनीवरून थेट अंतराळातील उपग्रह निकामी करण्याच्या या प्रकारला अंतराळ युद्ध (स्पेस वॉर) म्हणतात. मात्र आतापर्यंत कुणीही शत्रूवर या क्षेपणास्त्राचा वापर केला नाही. अमेरिका, रशिया, चीनने केवळ अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या चाचण्या केल्या आहेत.
1950च्या दशकापासून अशा प्रकारची क्षेपणास्त्र तयार करण्याची सुरुवात झाली. अमेरिकेनं पहिल्यांदा 13 सप्टेंबर 1985 रोजी ASM-135 ASAT अँटी-सॅटेलाईट मिसाईल यशस्वी चाचणी केली. त्यानंतर 2007 मध्ये चीनकडून तर 2016 मध्ये रशियाकडून अँटी-सॅटेलाईट मिसाईलची यशस्वी चाचणी करण्यात आली
27 मार्च 2019 रोजी DRDO नं केलेल्या यशस्वी चाचणीनंतर भारतानं आपलं नाव अंतराळातली महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. ही चाचणी यशस्वी करणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. 2017पासून इस्रायलकडून अशा क्षेपणास्त्राची चाचणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ए सॅट क्षेपणास्त्राच्या मदतीनं एलईओ लाईव्ह सॅटलाईट अवघ्या 3 मिनिटांत वेध घेऊन निकामी करण्यात भारत यशस्वी ठरला आहे.