विजय राठौड, प्रतिनिधी ग्वाल्हेर, 23 मे : लग्नात प्रत्येक वराचे जोडे चोरल्यानंतर त्याला तो परत हवा असेल तर पैसे द्यावे लागतात. मात्र, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक असा विवाह झाला, जिथे वराला दंड भरावा लागला. महापालिकेने वराला दंड करून तो वसूल करण्याची ही अनोखी घटना आहे. महापालिका आयुक्त हर्ष सिंह यांनी सांगितले की, शहरातील कंपू भागातील प्रभाग 46 मधील गणेश मंदिराजवळ विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. इथे लग्न थाटामाटात होत होते. मात्र, यादरम्यान, लग्न समारंभातील उरलेले अन्न व घाण लोकांनी रस्त्यावर फेकले.
मुख्य रस्त्यावरील कचरा व अस्वच्छता याची माहिती महापालिकेपर्यंत पोहोचली. यानंतर महापालिकेचे आरोग्य अधिकारी भीष्म पमनानी यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी अर्जुन दास आणि जेएचओ रमेशचंद्र धौलपुरिया यांनी संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली. यासोबतच भविष्यात अशी चूक होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या संदर्भात महापालिकेकडून वराला एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शहरात सुरुये स्वच्छता मिशन - शहरातील स्वच्छता व्यवस्थेच्या दृष्टीने स्वच्छता अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. आगामी काळात स्वच्छतेबाबत लोकांना सूचना केल्या जात आहेत. लोकांमध्ये अस्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण व्हावी आणि शहर अधिक स्वच्छ व्हावे, यासाठी याबाबत जोरदार प्रसिद्धी केली जात आहे. स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील घरोघरी जाऊन सकाळी महापालिकेच्या वाहनाद्वारे कचरा उचलला जातो, जेणेकरून रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा आणि अस्वच्छता दिसणार नाही.