पुलवामा हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. लोकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का बाप भारतात केंद्रीय मंत्री असताना मुलगा पाकिस्तानी लष्करात मोठ्या पदावर होता.
आझाद हिंद सेनेतील जनरल शाहनवाज खान. पाकिस्तानातील रावळपिंडीत त्यांचा जन्म झाला. तिथंच त्यांचं शिक्षणही झालं. त्यानंतर ब्रिटीशांच्या सेनेत कॅप्टनही झाले. पुढे ते आझाद हिंद सेनेत मेजर जनरल झाले.
आझाद हिंद सेनेने समर्पण केल्यानंतर शाहनवाज खान यांना लाल किल्ल्यात बंदिस्त करण्यात आले होते. लाल किल्ल्यावर कोर्ट मार्शल झाले होते. त्यावेळी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी त्यांच्यासाठी वकीली केली. स्वतंत्र भारतात ब्रिटीशांचा झेंडा उतरवून तिरंगा लाल किल्ल्यावर फडकवणारे शाहनवाज खान हेच होते.
शाहनवाज यांचं संपूर्ण कुटुंबीय रावळपिंडीत राहत होतं. फाळणीनंतर शाहनवाज आपल्या चार मुलांपैकी एका मुलाला घेऊन भारतात आले. त्यानंतर नेहरुंनी त्यांना केंद्रीय मंत्रीही केले.
मेजर जनरल शाहनवाज मेरठमधून खासदार झाले होते. जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये 1965 ला युद्ध सुरू झाले तेव्हा शाहनवाज केंद्रीय मंत्री होते. त्याचवेळी शाहनवाज यांचा मुलगा पाकिस्तानी सैन्यात असल्याची बातमी भारतात आली. त्या मुलाचे नाव महमूद नवाज अली असे होते. ऐन युद्धाच्यावेळी अशी बातमी आल्याने विरोधकांनी शाहनवाज यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
देशाचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्रींवर शाहनवाज यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी दबाव वाढला. तेव्हा राजीनामा घेण्यास शास्त्रींनी नकार दिला. त्यांचा मुलगा शत्रूसेनेत आहे त्यात शाहनवाज यांची काय चूक? असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. आजही शाहनवाज यांच्या कुटुंबातील अनेकजण पाकिस्तानच्या सैन्यात मोठ्या पदावर आहेत.
शाहनवाज यांचा मुलगा जोपर्यंत पाकिस्तानच्या सैन्यदलात कार्यरत होता तोपर्यंत दोघांची कधीच भेट झाली नव्हती. निवृत्तीनंतर वडिलांना भेटण्यासाठी महमूद नवाज भारतात आला होता. शाहनवाज यांचा भाऊ पाकिस्तानी सैन्यात ब्रिगेडिअर पदापर्यंत पोहचला होता.
शाहनवाज यांचे वयाच्या 69व्या वर्षी 1983 ला निधन झालं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जनरल शाहनवाज मेमोरियल फाउंडेशन गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत करते. नवी दिल्लीत या फाउंडेशनचे मुख्यालय आहे.