लखनऊ, 9 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Elections) पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे; पण आतापासूनच तिथलं वातावरण रंगू लागलं आहे. त्यात समाजवादी पार्टी आता परफ्यूमचा (Samajwadi Perfume) दरवळही या वेळेस लोकांमध्ये पसरवणार आहे. समाजवादी पार्टीने ‘समाजवादी’ या स्वतःच्या परफ्यूमचं नुकतंच लाँचिंग केलं. हे समाजवादी पार्टीचं परफ्यूम आहे. हा निवडणूक रणनीतीचा भाग आहे की आणखी काही, हे लवकरच कळेल. अत्तरं आणि सुगंधी द्रव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कनौजचे (Kanauj) विधान परिषद आमदार पुष्पराज तथा पम्मी जैन (Pammi Jain) यांनी या समाजवादी परफ्यूमचं (Samajwadi Perfume) लाँचिंग केलं. 2022 साली ही निवडणूक होणार आहे आणि हे परफ्यूम 22 नैसर्गिक सुगंधी द्रव्यांपासून बनवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता 22 ही संख्या हा निव्वळ योगायोग आहे की ते जाणीवपूर्वक बनवण्यात आलं आहे याबद्दल माहिती नाही.
याचा सुगंध कसा आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. “लोक जेव्हा हा परफ्यूम वापरतील तेव्हा त्यांना त्यात नक्कीच समाजवादाचा सुवास येईल” असं उत्तर जैन यांनी दिलं. फक्त इतकंच नाही तर “या परफ्यूममुळे 2022 सालात द्वेषाचा अंत होईल,” असंही ते म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अर्थातच त्यासाठी सगळ्या मोठ्या पक्षांनी आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे.
या परफ्यूमच्या बॉक्सवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह आणि रंग आहेत. या बॉक्सच्या पाठीमागे जैन यांनी स्वत:चा नंबरही दिला आहे. हे परफ्यूम काचेच्या बाटलीत आणि लाल आणि हिरव्या रंगात आहे. बाटलीवरही समाजवादी पार्टीचं नाव आणि सायकलचं चिन्ह आहे.
समाजवादी पक्षाने 12 ऑक्टोबर रोजी कानपूरमधून विजय रथ यात्रा सुरू केली असून, त्याद्वारे प्रचारमोहिमेचा नारळ फोडला आहे. या वेळी समाजवादी पक्ष काँग्रेस आणि बसप यांपैकी कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचं पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सांगितलं. 'समाजवादी पक्ष हेच खरं आव्हान असल्याचं सत्ताधारी भाजपला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशात काँग्रेस आपलं सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गैरसमज भाजप पसरवत आहे,' असं मतही यादव यांनी व्यक्त केलं.
नोटाबंदीच्या निर्णयाला पाच वर्षं पूर्ण झाल्याचा निषेध म्हणून समाजवादी पार्टीनं सोमवारी (8 नोव्हेंबर) राज्यस्तरीय आंदोलन केलं. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे अनेकांचे जीव गेले आणि व्यवसाय-उद्योगही उद्ध्वस्त झाल्याचा आरोप आंदोलनावेळी करण्यात आला. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांना आळा बसेल असा दावा भाजपकडून करण्यात येत होता; पण प्रत्यक्षात तसं झालं नाही असा आरोप यादव यांनी केला.
“जे लोक पैसे घेऊन परदेशात पळून गेले किंवा काळ्या पैशांसोबत आता परदेशातच स्थायिक झाले अशांची नावं नोटाबंदीला पाच वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपनं जाहीर करावीत. कोणत्याही प्रकारच्या काळ्या पैशांना, भ्रष्टाचाराला किंवा दहशतवादाला आळा बसलेला नाही,” असं अखिलेश यादव (Akhilesh Yadav) म्हणाले.
उत्तर प्रदेशातले प्रसिद्ध राजकीय नेते ओम प्रकाश राजभर (Om Praksh Rajbhar) यांना समाजवादी पार्टीनं आपल्या पक्षात याआधीच घेतलं आहे. आता येत्या निवडणुकीत राजभर पक्षाचं भविष्य बदलू शकतील का हे पाहावं लागेल. आगामी निवडणुकीत विकास हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे आणि त्याचाच अखिलेश यादव यांना फायदा झाला होता, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचा (SBSP) राज्याच्या पूर्वांचल भागात किती प्रभाव आहे याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे असंही तज्ज्ञांचं मत आहे.
निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष विविध युक्त्या लढवत असतात. त्यात उत्तर प्रदेशातली लढाई तर सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. ‘समाजवादी परफ्यूम’च्या निमित्तानं समाजवादी पक्षाची चर्चा तर सुरू झालीच आहे. एकूणच, दिवाळीनंतर आता उत्तर प्रदेशात राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh