नवी दिल्ली, 15 एप्रिल : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कावेरी वसतिगृहात रामनवमीच्या मुहूर्तावर मेसमध्ये मांसाहार देण्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये गोंधळ झाला होता. मात्र, अद्यापही हा गोंधळ शांत झालेला दिसत नाही आहे. जेएनयू प्रशासन आणि दिल्ली पोलीसदेखील याबाबत पूर्णपणे सतर्क झाले आहे. अशा स्थितीत आता हिंदू सेनेच्या (Hindu Sena) वतीने जेएनयूच्या मुख्य गेटवर भगवे झेंडे आणि भगवे जेएनयूच्या पोस्टर्समुळे प्रकरण आणखी चिघळले आहे.
हिंदू सेनेच्या या घडामोडीवर अजून कोणतीही कारवाई झाल्याचे किंवा हे भगवे झेंडे, पोस्टर्स हटविण्याबाबतचे कोणतीही सूचना मिळाली नाही. मात्र, जेएनयू प्रशासन आणि दिल्ली पोलीस रामनवमी नंतर चिघळलेल्या या संघर्षावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.
बुधवारी जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित (VC Prof. Santishree Dhulipudi Pandit) यांनीही आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. जेएनयू हे स्वतंत्र विद्यापीठ आहे. आम्ही व्यक्तींच्या निवडीचा आदर करतो. हे तरुण लोकांचे मत आहे आणि आम्ही विविधता आणि असहमतीची प्रशंसा करतो. पण हिंसाचार होता कामा नये, असे त्या म्हणाल्या. तर तेच दुसरीकडे टुकडे टुकडे गँगसारख्या वक्तव्यावर कुलगुरू प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित म्हणाल्या होत्या की, आम्ही तुकडे तुकडे गँग आहोत ही जनतेची संकल्पना मला बदलवायची करायची आहे. त्या म्हणाले की, मी पदभार स्वीकारल्यापासून कोणीही असे बोलताना दिसले नाही. आम्ही इतरांसारखेच राष्ट्रवादी आहोत.
हेही वाचा - Corona Virus In Delhi: राजधानी दिल्लीत वाढतोय Corona, शाळांबाबत दिल्ली सरकारचा कठोर निर्णय
विद्यापीठात असं घडलं तर देश प्रगती करू शकत नाही -
शाळा आणि महविद्यालयात मारामारी आणि गुंडगिरी असेल तर देशाची प्रगती कधीच होणार नाही. मुलं शाळा-कॉलेजात शिकायला जातात आणि या ठिकाणी फक्त शिक्षण व्हायला हवं. शिक्षण असेल तरच देशाची प्रगती होईल, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी दिली.
शिक्षण मंत्रालयाने मागविला अहवाल - दरम्यान, रामनवमीच्या मुहूर्तावर जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या अशांततेचा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मागवला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) अज्ञात सदस्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्याचबरोबर कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला. सध्या कॅम्पसची सुरक्षा जेएनयूचे सुरक्षा कर्मचारी सांभाळत आहेत. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांचे कर्मचारीही परिसराबाहेर तैनात आहेत.