नवी दिल्ली 24 डिसेंबर: काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि निवेदन दिलं. काँग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा असून हे कायदे तातडीने मागे घ्यायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना दहशतवादी ठरवलं जात आहे. उद्या सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) हे जरी या कायद्यांच्या विरोधात बोलले तर त्यांनाही मोदी सरकार दहशतवादी ठरवेल असा हल्लाबोलही त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना खालिस्तानी ठरवलं जात आहे. या देशातला शेतकी वर्ग, मजूर वर्गाला सरकारची भूमिका आता कळाली आहे. मोदी सरकार हे गरिबांसाठी नाही तर फक्त काही मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारने संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावून हे कायदे रद्द करावे. जोपर्यंत हे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलन थांबविणार नाहीत असंही राहुल गांधी यांनी सांगितलं. हा कायदा शेतकरी विरोधी असून सर्व देश या कायद्याच्या विरोधात उभा राहिला आहे असंही ते म्हणाले.
India is now an imaginary democracy. pic.twitter.com/4WZJiJ9Xel
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 24, 2020
गेल्या महिनाभरापासून पंजाबमधले शेतकरी हे आंदोलन करत आहेत. नवे शेतकरी कायदे रद्द करा अशी त्यांची मुख्य मागणी आहे तर सरकार कायदे रद्द करण्यास तयार नाही. सरकार आणि शेतकऱ्यांच्या विविध संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही.