तृणमूल कॉंग्रेसच्या युवा, तडफदार खासदार महुआ मोइत्रा सध्या चर्चेत आहेत. लोकसभेतील त्यांच्या भाषणाचं अनेकजण कौतुक करत आहेत. या बेधडक राजकारणी तरुणीचा सोशल मीडियावरही जोरदार ट्रेंड आहे. बँकर असलेल्या महुआ मोइत्रा यांचा राजकारणापर्यंतचा प्रवास अतिशय उत्कंठावर्धक आहे.
अतिशय बुद्धीमान असलेल्या मोइत्रा यांनी लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या दमदार भाषणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे त्या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रेंड होत आहेत. याभाषणात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आणि सध्याचे राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांच्यावर जोरदार टीका केली होती. या भाषणावर सर्वांना आक्षेप असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं होतं. त्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अवघ्या पाच वर्षाची राजकीय कारकीर्द असलेल्या महुआ मोइत्रा वादांमुळे सातत्यानं चर्चेत असतात.कधी बंगालमधील स्थानिक माध्यम त्यांच्या भाष्यावर नाराज होतात, तर भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्याशी त्यांचे वाद झाले. आसाममध्ये महिला पोलिसाशी वाईट वर्तन केल्यामुळेही त्या चर्चेत होत्या. पहिल्यांदा त्यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर करीमनगरमधून विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना पक्षानं लोकसभेचं तिकीट दिलं.
खासदार होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय वेगवान आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना राजकारणात रस असला तरी पदवी घेतल्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी तिथंच जेपी मोर्गन या बड्या कंपनीत नोकरी सुरू केली. तिथं झपाट्यानं प्रगती करत त्या कंपनीच्या लंडनमधील शाखेच्या व्हाईस प्रेसिडेंट बनल्या. मुबलक पैसा, उत्तम कारकीर्द सुरू असताना त्यांना लक्षात आले की आपण नोकरीत कायम अडकून पडू शकत नाही. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. त्यामुळे त्या सगळं सोडून भारतात परत आल्या आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
2008 मध्ये भारतात आल्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधींनी त्यांना बंगालमध्ये युवा कॉंग्रेसमध्ये काम करण्यास सांगितलं. लवकरच त्या युवा कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये गणल्या जाऊ लागल्या. बंगालमध्ये महुआ यांनी कॉंग्रेसच्या अनेक कार्यक्रमांचं उत्तम संयोजन केलं होतं. राहुल गांधी यांचा त्यांच्यावर विश्वास होता पण जेव्हा कॉंग्रेसनं निवडणूकीत डाव्या पक्षांबरोबर युती केली तेव्हा ते महुआ यांना पटलं नाही आणि त्या कॉंग्रेसमधून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी झळाळी आली. ममता बनर्जी यांचा विश्वास मिळवून लवकरच त्या पक्षाच्या प्रवक्त्या बनल्या. 2016 मध्ये त्यांना विधानसभा निवडणूकीत आणि त्यानंतर लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी मिळाली. आता त्या लोकसभेत जोरदारपणे प्रश्न विचारणाऱ्या, मत मांडणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.