नवी दिल्ली, 06 जानेवारी: राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी रात्री उशिरा मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारावरून डाव्या संघटना आणि अभविपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.जेएनयूमध्ये चेहरा लपवून आलेल्या गुंडांनी रविवारी जवळपास 30 मिनिटं असा धुडगूस घातला. साबरमती वसतीगृहासह आजूबाजूच्या इमारतींमध्ये लोखंडी गजांनी तोडफोड केली. यासोबत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना देखिल मारहाण केली. या हिंसाचारात जवळपास 20 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान जेएनयूमध्ये हिंसा कशी झाली याबाबत माहिती समोर आली आहे. JNU विद्यापीठात रविवारी नेमकं काय घडलं? JNU प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या परिसरात 8 ऑक्टोबरपासून वसतिगृहाची फी वाढवल्याविरोधात छात्रसंघासोबत इतर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. फी वाढीचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेमिस्ट परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. डाव्या संघटनांनी दोन दिवस सर्व्हर रूमवर कब्जा केला होता. त्यांनी विद्यापीठातील रजिस्ट्रेशन प्रक्रिया बंद पाडली होती. पुढच्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख रविवारी असल्यानं काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेले होते. तेव्हा डाव्या संघटनांनी त्यांना रोखलं आणि हुज्जत घातली. याच दरम्यान धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्यामुळे वातावरण थोडं तापलं. ही घटना घडत असताना काही शिक्षही तिथे उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि हिंसाचार झाला. गेल्या काही दिवसांपासून JNUमध्ये फी वाढी विरोधात आंदोलन सुरू आहे. त्यातच CAA आणि NRC विरोधात आंदोलन पेटल्याने वातावरण तापलेलं होतं. अशी परिस्थिती असताना रविवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.
JNUSU President has been brutually attacked by ABVP Gundas. #SOSJNU pic.twitter.com/X9yJ4r7DeY
— JNUSU (@JNUSUofficial) January 5, 2020
चेहरा लपवून आलेल्या गुंडांचा धुमाकूळ JNU विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या साबरमती वसतिगृहाच्या टी पॉइंटवर छात्रसंघाकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. य़ाच वेळी 40 ते 50 तरुण रुमालाने चेहरा लपवलेले गुंड विद्यापीठाच्या परिसरात घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण सुरू केली. हाताला मिळणारं सामान उचलून त्यांनी तोडफोड केली. समानाचं नुकसान केलं. लोखंडी रॉडने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आणि तरुण पसार झाले. दरम्यान या घटनेनंतर अभविप आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीचे आदेश दिल्ली पोलिसांनी दिले आहेत.