श्रीनगर 27 डिसेंबर: जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) स्थानिक निवडणुका (DDC Election) शांततेत पार पडल्या. त्यामुळे दिलासा व्यक्त होत असतानाच लष्कराच्या अधिकाऱ्याने सगळ्यांची चिंता वाढवणारा खुलासा केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 250 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा लष्काराच्या 15व्या कोअरचे मुख्य लेफ्टनंट बी एस राजू (General BS Raju) यांनी केला आहे. त्यासाठी LoCवर पाकिस्तान तणाव वाढवू शकतो असं राजू यांनी सांगितलंय. लष्कराकडे जी माहिती आली आहे त्या माहितीच्या आधारेच आपण हा दावा करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हिमवर्षावाला सुरुवात झाली आहे. सीमेवरच्या पर्वतांवर आणि टेकड्यांवर बर्फ जमा झाला. प्रचंड थंडी आहे त्यामुळे सैनिकांवरही मर्यादा आल्या आहेत. त्याचा फायदा घेत हे दहशतवादी घुसखोरी करण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) दहशतवाद्यांचे तळ आहेत. तिथे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. याच तळांवर हे दहशतवादी शस्त्रसज्ज असल्याचीही माहिती लष्कराने दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये पंचायत निवडणुका शांततेत पार पडल्याने पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटमध्ये हवाई हल्ले करून पाकिस्तानला आपली शक्ती दाखवून दिली आहे. मात्र त्यानंतरही पाकिस्तानची खोड गेलेली नाही.
भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणणे, काश्मिरी तरुणांना फूस लावत त्यांची माथी भडकविणे असे उद्योग पाकिस्तान सातत्याने करत असतो. लष्कराने धाडसी मोहिम राबवत गेल्या वर्षभरात 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान ड्रोन्सच्या माध्यमातूनही भारतात पंजाब आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना शस्त्रपुरवढा करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.