कोलकाता, 19 मार्च : 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष शिल्लक आहे, त्याआधी भाजपविरोधी पक्ष एकत्र यायला सुरूवात झाली आहे, पण प्रमुख विरोधकांपैकी एक असलेल्या ममता बॅनर्जी यांनी आतापासूनच काँग्रेसवर हल्ला करायला सुरूवात केली आहे. राहुल गांधी विरोधी पक्षाचा चेहरा असतील तर नरेंद्र मोदींना कुणीच हरवू शकत नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
'राहुल गांधी जोपर्यंत विरोधी पक्षाचे नेते आहेत, तोपर्यंत मोदींचं कुणीही काहीही बिघडवू शकत नाहीत, त्यामुळे भाजपला त्यांना नेता बनवायचं आहे. ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, ते भाजपचे नंबर एक व्यक्ती आहेत. भाजप, काँग्रेस आणि लेफ्ट सगळे एकमेकांना मिळालेले आहेत,' असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
सागरदिघी पोटनिवडणुकीतल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी मुर्शिदाबादमध्ये कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावरही निशाणा साधला. अधीर रंजन चौधरी यांनी पोटनिवडणुकीत आरएसएस-सीपीएम यांच्यासोबत प्लानिंग केलं होतं, ते भाजपचे नंबर एक नेते आहेत. राहुल गांधींना नेता बनवण्यासाठी त्यांनी संसदेत हंगामा करून दिला. राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते राहावेत, अशी भाजपची इच्छा आहे.
ममता बॅनर्जी देशातल्या अनेक नेत्यांसोबत मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी काहीच दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर विरोधी पक्षाची आघाडी होईल, असा विश्वास अखिलेस यादव यांनी व्यक्त केला. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा सामना करण्यात प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील, असं अखिलेश म्हणाले. तसंच कुठे राहायचं हे काँग्रेसने ठरवावं, ते राष्ट्रीय पक्ष आहेत, तर आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत, अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mamta Banerjee, Narendra Modi, Rahul gandhi