मुंबई, 16 मे : मे महिन्याच्या मध्यानंतर नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत असतात. त्यात यंदा मान्सून लवकर आल्याने नागरिकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अखेर अंदमानच्या समुद्रात मान्सून (Monsoon Arrive) दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवस केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. केरळमध्ये नेहमीपेक्षा पाच दिवस आधी म्हणजे 27 मे रोजीच मान्सून दाखल होईल असा अंदाजही हवामान विभागानं काही दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. सर्वसाधारणपणे केरळमध्ये 1 जूनपर्यंत, तळकोकणात 7 जूनपर्यंत आणि मुंबईत 10 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतभर मान्सून पसरतो. यंदा मात्र आठवडाभरापूर्वीच मान्सनचं आगमन झालं आहे. महाराष्ट्रात काय असेल स्थिती? दरम्यान, कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 ते 19 मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
#SWMonsoon2022
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 16, 2022
Good news:
SW Monsoon today 16 May; arrived over Andaman Sea.
अंदमानच्या समुद्रात आज मान्सून दाखल ..
अंदमानके समुद्र में आज मान्सून दाखील.
- IMD pic.twitter.com/akWTJvHn5W
सर्वसाधारणपणे मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. दरम्यान यंदा चार दिवस आधीच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार हवामानाचा अंदाज शेती, शेती आणि सिंचन, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी हवामानाचा अंदाज मराठीसह अन्य 24 सोप्या भाषेत सांगणारे अॅप आता लवकरच उपलब्ध होणार आहे. भारतीय हवामान विभाग आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संयुक्तपणे ही प्रणाली विकसित करण्यात येत असून ती लवकरच शेतकर्यांसाठी उपलब्ध होणार आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने ही प्रणाली विकसीत करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण, शहरी आणि जिल्हा स्तरावरील नागरिकांसाठी हवामानाचे अंदाज सोप्या पद्धतीने समजण्यासाठी या प्रणालींची निर्मिती केली जाणार आहे.