नवी दिल्ली, 23 डिसेंबर: कोरोना विषाणूचा (Corona virus) नवीन व्हेरियंट, ओमिक्रॉनमुळं (Omicron variant) सरकार आणि नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भारतात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या एकाच आठवड्यात 200 च्या पुढे गेली आहे. सध्या देशातील 16 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे एकूण 236 रुग्ण आढळले आहेत. भारतामध्ये 2 डिसेंबर रोजी ओमिक्रॉनची पहिली केस आढळली होती. त्यादिवशी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर देशात विविध ठिकाणी ओमिक्रॉनचे रुग्ण (Omicron patients) आढळले आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये तर परिस्थिती बिकट होत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) माहितीनुसार, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 65 आणि दिल्लीत 64 रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती पाहता, नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतात कोरोनाची तिसरी लाट (Covid Third Wave) येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची असेल, असंही ते म्हणाले.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. पण, सध्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात इम्युनिटी आहे. त्यामुळं तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी घातक असेल. मात्र, तिसरी लाट येईल हे नक्की आहे, अशी माहिती नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीचे (National Covid-19 Supermodel Committee) सदस्य विद्यासागर (Vidyasagar) यांनी न्यूज एजन्सी एएनआयला दिली.
या वर्षी एप्रिल-मेमध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट आली होती. या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. सरकारनं 1 मार्चपासून नागरिकांसाठी लसीकरण (COVID Vaccination) सुरू केलं होतं. नेमकं त्याचं वेळी भारतात डेल्टाचा प्रवेश झाला. तोपर्यंत फक्त फ्रंटलाईन वर्कर्सलाचं (Frontline Workers) लस मिळालेली होती. इतर नागरिकांना लस मिळालेली नव्हती. त्यामुळं डेल्टा व्हेरियंटमुळं (Delta variant) देशात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. आता लसीकरण जवळपास पूर्ण होत आलेलं आहे त्यामुळं तिसरी लाट जास्त घातक ठरणार नाही, असंही विद्यासागर म्हणाले.
विद्यासागर यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील रुग्ण संख्येमध्ये कमालीची वाढ झाली होती. तो अनुभव पाहता आरोग्य यंत्रणेनं आपली क्षमता वाढवलेली आहे आणि पूर्वतयारी देखील केलेली आहे. त्यामुळे तिसरी लाट आल्यास जास्त संकटांचा सामना करावा लागणार नाही.
शास्त्रज्ञ मनिंद्र अग्रवाल (Manindra Agrawal) म्हणाले की, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये (2022) कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लाट सर्वोच्च स्तरावर जाण्याची शक्यता आहे. त्याकाळात देशात दररोज एक लाख ते दीड लाख रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या निरीक्षणानुसार ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमी घातक असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळं तिसऱ्या लाटेचे जास्त गंभीर परिणाम होणार नाहीत.
कोरोनाची तिसरी लाट मोठ्या प्रमाणात घातक ठरणार नाही अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, नागरिकांनी याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. प्रत्येकानं आपली काळजी घ्यावी आणि शासनाच्या नियमांचं पालन करावं. अन्यथा कमी घातक गोष्ट नियंत्रणाबाहेर जाण्यास जास्त वेळ लागणार नाही, हे नक्की.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.