नवी दिल्ली, 30 मे : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसअंतर्गत अनेक हालचालीही सुरू झाल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पक्षाने आता आणखी एक भूमिका जाहीर केली आहे.
पुढील महिनाभर पक्षाचा कोणताही प्रवक्ता वृत्तवाहिन्यांवरील डिबेट शोमध्ये सहभागी होणार नाही, असा निर्णय काँग्रेसने जाहीर केला आहे. काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. पण हा निर्णय घेण्यामागे नेमकं कोणतं कारण आहे, हे मात्र काँग्रेसकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
.@INCIndia has decided to not send spokespersons on television debates for a month.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 30, 2019
All media channels/editors are requested to not place Congress representatives on their shows.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षात गोंधळ सुरू झाला आहे. पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. राहुल गांधींनी जरी अध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव दिला असला तरी या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या उच्च स्तरावर कोणते बदल होतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक मार्गांचा विचार केला जात आहे. केवळ केंद्रीय पातळीवरच नाही तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील पक्षाची अवस्था बिकट आहे. त्यातच राहुल गांधींच्या निर्णयामुळे पक्षात आणखी गोंधळ वाढला आहे.
राहुल गांधींच्या निर्णयावर नाराज झालेल्या काँग्रेसमधील नेत्यांनी मंगळवारी सरचिटणीस प्रियांका गांधी यांची निवासस्थानी भेट घेतली. पक्षातील काही नेत्यांच्या मते राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा निर्णय म्हणजे जबाबदारी पासून पळ काढण्यासारखा आहे. पण प्रियांका यांनी या नेत्यांनी स्पष्ट केले की राहुल गांधी पळ काढत नाही तर गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे. यासाठी प्रियांका यांनी काँग्रेसमध्ये याआधी नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्तींनी पक्षाचे नेतृत्व केल्याची उदाहरणे दिली.
SPECIAL REPORT: मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कुणाला संधी?