भोपाळ, 2 फेब्रुवारी: अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरासाठी (Ram Temple) निधी गोळा करण्याचं काम सध्या देशभर सुरु आहे. संघ परिवार आणि भाजपचे कार्यकर्ते घराघरामध्ये जावून या मंदिरासाठी स्वेच्छेनं निधी गोळा करत आहेत. भाजप-संघ परिवाराच्या या अभियानावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. ‘भाजप नेते या पैशांमध्ये रात्री दारू पितात,’ असा गंभीर आरोप माजी केंद्रीय मंत्री कांतीलाल भूरिया (Kantilal Bhuria) यांनी केला आहे. काय आहे आरोप? कांतीलाल भूरिया हे मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते आहेत. ते युपीए 2 (UPA 2) सरकारच्या राजवटीमध्ये केंद्रीय मंत्री होते. तसंच ते झाबुआमधून पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना भूरिया म्हणाले की " भाजपा नेते राम मंदिराच्या नावाखाली लोकांकडून निधी गोळा करतात आणि रात्री याच पैशांंमधून दारु पितात.’’ त्यांच्या या आरोपाची व्हिडीओ क्लिप (Video Clip) सोशल मीडियावर व्हायरल (Viral ) झाली आहे.
दिग्विजय सिंह यांनीही केला होता आरोप राम मंदिरासाठी निधी संकलनावरुन मध्य प्रदेशातील राजकारण तापलं आहे. यानिमित्तानं मुस्लीम समाजातील वस्तींना टार्गेट केलं जात आहे. या प्रकरणाची निवृत्त सचिव किंवा पोलीस महासंचलाकांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी केली होती. विशेष म्हणजे सिंग यांनी स्वत: राम मंदिराच्या निर्मितीसाठी देणगी दिलेली आहे. दिग्विजय सिंह यांचे भाऊ आणि काँग्रेस नेते लक्ष्मण सिंह (Laxman Singh) यांनी मात्र ‘या चोरांना कोणताही निधी देणार नाही’, अशी घोषणा भाजपाचा संदर्भ देत केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं अयोध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिराची निर्मिती सुरु झाली आहे. या कामासाठी आजवर 100 कोटी रुपयांचा निधी गोळा झाला आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे (Shree Ram Janmabhoomi Teerth Kshetra) संयुक्त सचिव चंपत राय यांनी दिली आहे.