नाशिक, 3 नोव्हेंबर : कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) हे नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दीही करत असतात. नाशिकमध्ये (Nashik) इंदुरीकर महाराजांचे झालेल्या कीर्तनाचा एक व्हिडीओ आता सध्या चर्चेत आहे. या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणावर (Corona vaccination) भाष्य केलं आहे. तसेच आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज?
इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात म्हणतात, प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची मेंदूची क्षणता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन काच करणार.... कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा.
एकीकडे संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असतानाच कीर्तनकार आपल्या कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे सार्वजनिकपणे नागरिकांना सांगत आहेत. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या या विधानावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाचा : दिवाळीच्या काळातली गर्दी चिंता वाढवणारी; कोरोनाच्या नव्या वेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका
यापूर्वी इंदुरीकर महाराज कीर्तनामुळे अडचणीत
काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात म्हटलं होतं, 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते'. इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडीओ युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केल्या होत्या.
या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं हे उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यानि त्यांना नोटीस पाठवली होती. यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांन मार्फत बाजू मंडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांची नोटीस दिली हाती.
30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण करा - मुख्यमंत्री
विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कोरोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.
आपआपल्या जिल्ह्यात 100 % लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचनाही केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Nashik