रत्नागिरी, 7 जुलै : गेल्या तीन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट (Red alert in Ratnagiri district) जारी केला आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नारंगी नद्यांना पूर आला आहे. या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. असे असताना शाळा देखील नियमितपणे सुरू आहे. मात्र यादरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. खेड तालुक्यातील नांदिवली दंडवाडी ते ढेबेवाडी यादरम्यान वाहणाऱ्या निगडीच्या ओढ्याने धोकादायक पातळी ओलांडल्यानंतर पलीकडच्या बाजूला शाळेतील विद्यार्थी अडकले होते. त्यांना घरी आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी या ओढ्यातून अत्यंत धोकादायक परिस्थितीत शाळेतल्या मुलांना सुरक्षित घरी आणण्यासाठी प्रयत्न केले.
सत्ता बदलली, परंतू राज्यातील हे चित्र कधी बदलणार? खेड - रत्नागिरी Exclusive video : धोकादायक पूर परिस्थितीत जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करावी लागत आहे. pic.twitter.com/RbTWm3ZQZH
— News18Lokmat (@News18lokmat) July 7, 2022
हा व्हिडिओ तिथल्या ग्रामस्थांनी पाठवला असून गेल्या कित्येक दिवसांपासून हा ओढा पार करण्यासाठी काहीतरी सोय करण्याची मागणी ढेबेवाडी येथील नागरिक करत आहेत. मात्र अजूनही त्या ठिकाणी साकवून झाल्यामुळे आज तेथे अडकलेल्या 12 विद्यार्थ्यांच्या पालकांनी जीव मुठीत घेऊन मुलांना दुसऱ्या बाजूला आणले. एका बाजूला मुसळधार पाऊस कोसळत आहे. नद्यांना पूर आलेला आहे. आठ तारखेपर्यंत शासनाने रेड अलर्ट दिला असताना देखील शाळा मात्र सुरू आहेत, याबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे.