मनोज गुप्ता, मुंबई 19 फेब्रुवारी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या ‘Let Me Say It Now’ या पुस्तकावरून सध्या वादळ निर्माण झालंय. या पुस्तकात मारियांनी अनेक महत्त्वांच्या आणि वादग्रस्त गोष्टी लिहिल्याने वाद निर्माण झाले आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना मारिया हे सेलिब्रेटी अधिकारी होते. एटीएसचे प्रमुख असतानाही त्यांनी अनेक धाडसी मोहिमा फत्ते केल्या होत्या. त्यामुळे त्यांची कायम चर्चा होत असते. निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी हे पुस्तक लिहून पुन्हा एकदा सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय. 26/11च्या मुंबईवरच्या हल्ल्यानंतर अजमल कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला होता. पाकिस्तानचा नागरीक असलेला दहशतवादी मुंबई पोलिसांनी जिवंत पकडणं हे मोठं यश होतं. अशा प्रकारे पकडला जाणारा तो पहिलाच दहशतवादी होता. त्यामुळे जगभर त्याची दखल घेतली गेली. अजमल कसाबकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता होती. ही शक्यता असल्यानेच दाऊद इब्रहिम त्याला ठार करू इच्छित होता. त्यासाठी त्याने त्यांच्या काही खास माणसांना जबाबदारीही दिली होती असं मारियांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं होतं. त्याच बरोबर या माध्यमातून हिंदू दहशतवादाची थेअरीही पाकिस्तानला पुढे आणायची होती असं त्यांनी म्हटलं होतं.
#Breaking- दाऊद इब्राहिम के क़रीबी छोटा शकील ने मुम्बई के पूर्व पुलिस कमिश्नर राकेश मारिया पर अपनी किताब में झूठ लिखने का आरोप लगाया है. NEWS18 से बातचीत में छोटा शकील ने राकेश मारिया पर अपनी किताब को प्रमोट करने के लिए दाऊद के नाम का इस्तेमाल करने का आरोप लगाया@PrashantChurhe pic.twitter.com/RL61vx2ZN9
— News18 India (@News18India) February 19, 2020
मारियांच्या या दाव्यानंतर दाऊदचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीलने त्या दाव्यावर खळबळजनक खुलासा केलाय. News18सोबत बोलताना छोटा शकीलने उलट मारियांवरच आरोप केलाय. पुस्तकाला प्रसिद्धी मिळावी म्हणून त्यांनी हे लिहिलं आहे. भारतात आता सगळेच खोटे बोलताहेत असंही तो म्हणाला. पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या ISIने आम्हाला काहीही सांगितलं नाही. तो आमचा विषयच नव्हता असंही त्याने सांगितलं.