मुंबई, 08 आॅगस्ट :भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचे शेवटचे चार दिवस अत्यंत डोकेदुखीचे ठरतील, अशी चिन्हं आहेत. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज अधिवेशन पुन्हा सुरू होताना सरकारची कसोटी लागलीय.
इगतपुरीतील एमआयडीसीची जमीन बिल्डरला दिल्याच्या आरोपावरून विरोधकांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. आज विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. एवढी मोठी जमीन मेक इन इंडियासाठी वगळणे म्हणजे प्रत्यक्षात मंत्र्यांचं फेक इन इंडिया असल्याचा आरोप त्यांनी केला.
तर त्यांच्याच सुरात सूर मिसळत अजित पवार यांनीही या प्रकरणी देसाईंची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली. भाजपपाठोपाठ सेनेच्याही मंत्र्यावर घोटाळ्याचा आरोप झाल्यामुळे सरकार काहीसं बॅकफूटवर गेलं.
मात्र देसाईंनी स्वतःची बाजू मांडताना सरकारच्या धोरणांना धरून आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायानंतरच सदर जमीन वगळण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं या प्रकरणात आपण काहीही चुकीचं केलेलं नसल्याचा दावा त्यांनी केला.
याशिवाय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आजपासून पुन्हा आक्रमक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Subhash desai