मुंबई, 10 जुलै : ठाकरे सरकार पडल्यानंतर आता शिंदे सरकार सत्तेत आलं आहे. तर काही दिवसांपूर्वी सत्ताधारी असणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी बाकावर गेले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी बंडाच्या निर्णयाला काहीच आधार नसल्याचे पवार म्हणाले. बंडखोरांना पुढे येऊन जनतेला खरं कारण सांगावं लागेल असंही ते म्हणाले. काय म्हणाले शरद पवार? बंडाच्या कारणामागे सांगितल्या जाणाऱ्या निर्णयाला आधार नाही. या निर्णयाला काहीच आधार दिसत नाही. त्यामुळे भविष्यात बंडखोरांना जनतेसमोर येऊन खरं कारण सांगावं लागेल. मध्यावधी निवडणुका लागतील असं मी म्हणालो नाही. पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असं सांगितलं आहे. आपल्या हातात दोन वर्ष आहे. हे लक्षात ठेऊन कामाला लागलं पाहिजे. 2024 साली निवडणूक एकत्र लढवावी अशी मनस्थिती आहे. मविआ म्हणून एकत्र लढावं अशी माझी इच्छा आहे. पण, अद्याप एकत्र लढवण्यावर चर्चा नाही. जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ठरवू, असं पवार म्हणाले. शिंदे यांचं बंड एका दिवसात झालं नाही. बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी जी तत्परता दाखवली. अशी तत्परता दाखवणारे पहिले राज्यपाल. पहिल्यांदाच 48 तासांत बहुमत चाचणीचा निर्णय देण्यात आला. औरंगाबादच्या निर्णयाबाबत सुसंवाद नव्हता. मंजुर झाल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली, अशीही कबुली पवार यांनी दिली. संजय राऊत यांच्यावर टीका करणारे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, असा टोला पवार यांनी बंडखोर नेते दीपक केसरकर यांना लगावली.
पक्षाच्या बळकटीसाठी शिवसेना अॅक्शन मोडमध्ये; कोल्हापूरमधील कार्यकारणीबाबत मोठा निर्णय
हे फाईव्हस्टार सरकार : सुळे दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात प्रति पंढरपूर असलेल्या मंदिराला भेट देत विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी शिंदे सरकार वर हल्लाबोल केला आहे. “विठ्ठलाचे आशीर्वाद आणि आभार मानण्यासाठी मी आले आहे. सरकार अस्थिर आहे, दादा म्हणतोय ते खरं आहे. लोक सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून आले. भारतदर्शन करून आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते हे दुर्दैवी आहे” अशी प्रतिक्रियाही दिली आहे. “शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि देत राहणार आहोत. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावल्या सारखे आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या 25 वर्षासाठी शुभेच्छा, असा टोमणाही लगावला.