मुंबई, 17 मार्च :देशात आणि राज्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत असताना खबरदारी म्हणून अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक ऑफिसांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आलं. पण असं असताना सगळ्यात धोक्याची आहे ती मुंबईची लोकल. कारण रोज लाखो मुंबईकर रेल्वेनं प्रवास करतात. त्यामुळे मुंबईची लोकल कोरोनामुळे बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. याबद्दल मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. आज दुपारी 3:30 वाजता यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल बंद करायची की नाही यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं टोपे म्हणाले. मास्क सॅनिटाझयरची बनावट विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा टोपेंनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं तर सुरक्षित आणि आरोग्यदायी रहा असा सल्ला दिला आहे.
कोरोनाव्हासरस झपाट्याने जगभरात पसरत आहे. चीनच्या वुहानपासून या विषाणूची सुरुवात झाली खरी मात्र आता या विषाणूने साऱ्या जगात दहशत पसरवली आहे. भारतातही या विषाणूचा शिरकाव होत आहे. दरम्यान चीनमधून हातपाय पसरवायला सुरुवात केलेल्या विषाणूचा चीनवर आता कमी परिणाम जाणवत आहे. त्याचे कारण आहे लॉक डाऊन. चीनमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सरकारने संपूर्ण देश बंद केला. आता भारतातही अशा परिस्थितीची शक्यता नाकारता येत नाही.
देशात कोरोनाची लागण झालेले सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे भारतात मृतांची संख्याही तीन झाली आहे. आज मुंबईतही कोरोनाने पहिला बळी घेतला. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्याची वेळ येऊ शकते.
कोरोना व्हायरसचा मुंबईत पहिला बळी
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतातही वेगाने प्रवेश केला. भारताची आर्थिक राजधानीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. आता कोरोनामुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईतील 64 वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्वरित कस्तुरबा दाखल करण्यात आले होते. मात्र आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला इतरही आजर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत झालेल्या या पहिल्या मृत्यूनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्वरित बैठक बोलवली आहे.
लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?
सध्या सरकारने मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा , स्विमिंग पूल) सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. मात्र लॉक डाऊन केल्यास नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाता येणार नाही. सध्या चीननंतर इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ आपत्तीजनक परिस्थिती असल्याशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. लॉक डाऊनमध्ये केवळ अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा असते.
मुंबई-पुण्यावर होणार गंभीर परिणाम
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी भारताकडे सध्या 30 दिवसांचा कालावधी आहे. भारतात सध्या कोरोना दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुंबईसह पुण्यातील सर्व शाळा आणि विद्यापीठांसह रेस्टॉरंट्स, बार आणि इतर अनावश्यक किरकोळ दुकानं बंद करण्यात आली आहेत.गर्दी कमी व्हावी यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. घरातून कार्यालयीन काम करणे शक्य नसेल, तरच बाहेर पडण्याची सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. ममात्र लॉक डाऊन झाल्यास मुंबई, पुण्यातील सर्व कामे ठप्प होतील. याचा सगळ्यात जास्त फटका व्यवसायिकांना बसेल. कारण अनिश्चित काळासाठी सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील. मात्र कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लॉक डाऊन सारखे गंभीर उपाय भारताला करावे लागतील. दरम्यान अद्याप याबाबत केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने कोणतीही माहिती दिलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona