मुंबई, 11 जानेवारी : सामाजिक प्रश्नावर अधिवेशनात दिवसभर चर्चा व्हावी, अशी भूमिका काँग्रेस नेते आणि राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतली आहे. अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान सामाजिक प्रश्नासंदर्भात एक दिवसाची चर्चा ठेवावी, अशी मागणी नितीन राऊत यांनी केली आहे.
'काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एससी, एसटी या घटकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काही सूचना देणारे पत्र पाठवलं होतं. यामध्ये नोकऱ्या, बढत्यांचा अनुषेश भरुन काढणे, त्यांच्या विकासासाठी योजनांचे पाठबळ देणे यासंबंधीचं मार्गदर्शन त्यांनी केलं होत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामाजिक न्यायाच्या विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे,' अशी भूमिका उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडली आहे.
'राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी लढतो आहे, ओबीसी बांधव आपले आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत, तर एससी, एसटी समाजाचा प्रलंबित पदोन्नतीसाठी लढा सुरू आहे. तसंच अल्पसंख्याक समाज शिक्षणामध्ये आरक्षणसाठी संघर्षरत आहे. या सर्व घटकांच्या विषयावर एकदा चर्चा होऊन आमचा महाविकास आघाडीचा सोशल अजेंडा काय आहे, तो जगापुढे आला पाहिजे. हा यामागचा उद्देश आहे,' असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमाची आठवण करून देणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्याने ही भूमिका घेतल्याने आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress