मुंबई, 21 जुलै : मुंबईचे पालकमंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेत दालन देण्यात आलं आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्यांना महापालिकेत दालन देण्यात आलं आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढा यांना दालन देण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. आदित्य ठाकरे यांनी 24 तासांमध्ये केबिन खाली करण्याचा इशारा दिला होता, पण तरीही मंगलप्रभात लोढा मुंबई महापालिकेतल्या त्यांच्या दालनात आले, तसंच त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. ‘मुंबई महापालिकेत दोन केबिन या मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी अशा केबिन बीएमसीमध्ये कधीही मंत्र्याना देण्यात आल्या नव्हत्या. मंत्र्यांचे अधिकार आणि पालिकेचे अधिकार वेगळे असतात. घोटाळा करण्यासाठी हे सर्व काही सुरू आहे. महाराष्ट्रातील महापौरांना मंत्रालयात केबिन देण्यात यावं,’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
📍मुंबई महानगर पालिका मुख्यालय
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) July 21, 2023
मा मुख्यमंत्री @mieknathshinde जी, मा उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी व मा उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी यांच्या नेतृत्वातील हे सरकार लोकाभिमुख काम करणारे सरकार आहे!
जनतेत जाऊन समस्या सोडवणारे सरकार आहे!
घरी बसून, सोशल मीडियातून चालणारे सरकार… pic.twitter.com/J3VXAs8j2g
लोढांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला मंगलप्रभात लोढा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘त्यांना जे काम करायचं ते करू द्या, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू. आदित्य ठाकरे यांचं जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालय कशा करता होतं?’ असा पलटवार मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. यांचं सरकार होतं तेव्हा मुंबईकरांनी त्याचे परिणाम भोगले आहेत. लोकांच्या समस्या सोडवायच्या नाही असं त्यांच्या मनात आहे का? हा कसला विरोध? असा प्रश्न मंगलप्रभात लोढा यांनी विचारला आहे.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील हे सरकार लोकाभिमुख काम करणारे सरकार आहे! जनतेत जाऊन समस्या सोडवणारे सरकार आहे! घरी बसून, सोशल मीडियातून चालणारे सरकार नव्हे!’ असा टोलाही मंगलप्रभात लोढा यांनी ठाकरेंना लगावला आहे.

)







