मुंबई, 30 ऑगस्ट : अनलॉक 4 बाबत केंद्र सरकारने काल (शनिवार) नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये केंद्राकडून 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरून आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. ‘केंद्र सरकार म्हणते 30 तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लॉकडाऊनमुळे बंद ..यूजीसी म्हणते 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय? 30 सप्टेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा?’ असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून काल उदय सामंत आणि कुलगुरुंची एक बैठक झाली. विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेऊन सहज, आणि सुलभ पध्दतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या बैठकीनंतर संगितले होते.
केंद्र सरकार म्हणते 30 तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लोक डाऊन मुळे बंद ..यूजीसी म्हणतy 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय ..30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा. pic.twitter.com/ZcePitfl6T
— Uday Samant (@samant_uday) August 30, 2020
शाळा उघडण्याबाबत काय आहेत केंद्र सरकारचे नियम: 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पण एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी देण्यात आली आहे. - कोचिंग क्लास किंवा इतर कुठल्याही ट्यूशन्स बंदच - ऑनलाईन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात. - नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी. - शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तकं किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक - शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात. - वय वर्षं 65 आणि त्यापुढच्या व्यक्तींनी ज्यांना काही आजार आहेत अशांनी आणि 10 वर्षांच्या आतल्या मुलांनी घरातच राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.