मुंबई 12 नोव्हेंबर: राज्यात कोरोनाचं संकट (Covid-19 Crisis) आहे. दिवाळी (Diwali) तोंडावर आलीय. सरकारची आर्थिक स्थिती तळाला गेली आहे. महसूलच नसल्याने सर्वच स्त्रोत आटले आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना तीनही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. बोनस मिळाला नाही तर 14 नोव्हेंबरपासून अभियंते आणि सर्व कर्मचारी संपावर जातील असं वीज संघटनांनी म्हटलं आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या 21 संघटनांची सरकारशी चर्चा झाली मात्र त्यातून तोडगा निघाला नाही त्यामुळे आम्ही हा संपाचा इशार देत असल्याचं या संघटनांनी म्हटलं आहे.
14 नोव्हेंबरलाच दिवाळी आहे आणि त्याच दिवसापासून या संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे दिवाळी अंधारात जाणार की काय असा प्रश्न आता विचारला जात आहे. मात्र दोन दिवसात तोडगा निघण्याची आशाही व्यक्त होत आहे.
कंपन्यांनी 2019-20मध्ये सरकारला 82 हजार कोटी रुपये महसूल मिळवून दिला. महावितरणला 150 तर महापारेषणला 130 कोटींचा नफा झाला. मात्र 1 लाख कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानासाठी सरकार 120 कोटी रुपये देत नाही असं या संघटनांनी म्हटलं आहे. 14 नोव्हेंबर सकाळी 8 वाजता पासून हा संप सुरू होणार आहे असल्याचं त्यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
गुरुवारी दीड तास चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही त्यामुळे आम्हा नाईलाजाने संपाचं हत्यार उचलत असल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा बोनस देण्यात येतो मात्र यावर्षी तो देण्यात येत नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे.