मुंबई 25 मे : लॉकडाऊनच्या दोन महिन्यानंतर आजपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा मर्यादित स्वरुपाची आहे. देशातल्या काही निवडक विमानतळांवरूनच ही सेवा सुरू होणार आहे. सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते मुंबई विमानतळाकडे. राज्य सरकार यासाठी सुरूवातीला राजी नव्हतं. मात्र नंतर राज्य सरकारची संमती असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. मुंबईत सुरुवातीला दररोज 25 विमानांचं लँडींग आणि तेवढीच विमानं उड्डाण घेणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरूवातीला यासाठी विरोध केला होता. मुंबई रेड झोनमध्ये येत असल्याने परवानगी देऊ नये असं त्यांचं मत होतं. मात्र हळूहळू जनजीवन पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने ही परवानगी दिली आहे. यासंदर्भात विमानतळ संचालकांची आज एक महत्त्वाची बैठकही होणार आहे. विमानतळाची सुरक्षा आणि सगळी काळजी घेऊन ही सेवा सुरू केली जाणार आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल 2 म्हणजेच टी-2 वरून उद्या फ्लाईट उड्डाण भरतील आणि लँड होतील. हे आहेत नियम… 14 वर्षा वरील सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अँप बंधनकारक 80 वर्षावरील आणि गरोदर महिलांना प्रवास प्रतीबंधीत मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना घरी अलगीकरणात राहावं लागणार
तर १ जून पासून रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दररोज देशात २०० ट्रेन्स धावणार आहेत.