प्रदीप भणगे, कल्याण, 26 जानेवारी : गेले अनेक वर्षे गटाराच्या आणि केमिकलच्या पाण्यावर नाल्यात/गटारात लपवलेले पंप लावून ते पाणी एका खड्यात साठवले जाते आणि त्याचा वापर शेती साठी केला जात असल्याचे अनेक प्रकार मुंबई आणि परिसरात समोर आले आहेत. कल्याण, डोंबिवली भागातही असे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचं दिसत आहे. या मुद्द्यावरून आता मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी काल स्वत: मैदानात उतरत सांडपाण्यावर सुरू असलेली विषारी पालेभाजी शेती नष्ट केली. यावरूनच आता मनसे शहराध्यक्षांनी कल्याण डोंबिवलीच्या महापौरांवर निशाणा साधला आहे. 'वातानुकुलीत कार्यालयातून बाहेर पडून प्रत्यक्ष मैदान उतरून नागरीकांचे भले करणे म्हणजे पद मिळाले. ते नुसते उपभोगत बसणे नव्हे, तर त्या पदाला आपल्या कामगिरीतून योग्य न्याय देणे गरजेचे आहे. हे जरी ठाणे महापौर करत असले तरी कडोंमपाचे महापौर फक्त नावापुरतेच उरल्याचे दिसतात. मोकाट अनाधिकृत बांधकामे, खड्डेमय रस्ते, रखडलेली विकास कामे, आरोग्य, घनकचरा प्रश्न हे पाहाता आमच्या महापौर विनिता विश्वनाथ राणे मॅडम झोपलेल्या आहेत की काय हेच दिसते. त्या उलट रोज दोन तीन कार्यक्रम राबवून सतत ठाणेकर नागरीकांसाठी धावणारे ठाण्याचे कार्यरत महापौर बघितले तर त्यांनाच सांगावेसे वाटते महापौर महोदय कृपया आमच्या महापौर तुमच्याच शिवसेना पक्षाच्या आहेत, त्यांना पण जरा हलवा, झोपेतून उठवा आणि कार्यरत करा,' अशी पोस्ट लिहित मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी महापोर विनिता विश्वनाथ राणे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
'आम्ही मनसे कार्यकर्त्यांनी अनेक वेळा नासधूस करून ही शेती बंद केली. पण सरकारी जागेत (रेल्वे) सरकारी परवानगीने पुन्हा पुन्हा ही विषारी शेतीची लागवड केली जाते. पिकलेला भाजीपाला त्याच गटाराच्या सांडपाण्यात, नाल्यात धुवून तो बाजारात विकतात. जर ठाण्यासारख्या शेजारी शहरात ही बंदी तर मग डोंबिवलीत का नाही, कारण डोंबिवलीच्या महापौर आहेत कुठे, तरी झोपल्या आहेत, म्हणून ठाण्याच्या महापौरांनी कृपया त्यांची जरा शाळा घ्यावी आणि डोंबिवलीत सुद्धा अशा विषारी शेतीवर कायम स्वरूपी बंधने आणून ती शेती नष्ट करावी,' अशी मागणी मनसेनं केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.