मुंबई, 7 जानेवारी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यपाल बनणं म्हणजे सर्व दु:खच दु:ख आहे. सुख काहीच नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यामुळे राज्यपाल वादात सापडलेत, त्यातच त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागल्याची चर्चा आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणाले कोश्यारी? ‘आपल्याकडे अवतार आहेत, अनेक गोष्टी आहेत, पंथ आहेत. आपल्याकडे सनातन आणि बौद्ध धर्म चालतो. एक धर्म आहे, जे दोघे भांडतात, मग त्यात दोन संप्रदाय होतात, त्यात पण भांडतात. पण आपल्याकडे जैन धर्माचा गुरूद्वारात जातो, गुरूद्वारातला मंदिरात जातो. आशिर्वाद दाता भगतसिंह लिहिलं आहे, पण ते बदलून आशिर्वाद मांगता कोश्यारी लिहायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, चंद्रशेखर, लोकमान्य व्हावेत अशी सगळ्यांची इच्छा असते, पण आपल्या नाही तर दुसऱ्यांच्या घरात जन्माला यावा, अशी भावना असते, ’ असं कोश्यारी म्हणाले.
‘राज्यपाल बनने से दुख ही दुख है, सुख तो कुछ भी नहीं है. मात्र अशी लोकं येतात तेव्हा कधी कधी बरं वाटतं. मी आता 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे मी तर काही आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. अशा लोकांजवळ येतो तेव्हा त्यांचा सुगंधही लागतो. जैन तीर्थ सर्कीट बनवलंय. सरकारला आवाहन आहे, पर्यटन मंत्रायलासोबतच तीर्थक्षेत्राचं मंत्रालयही व्हावं. सर्वच मुमूक्षू, मुनी राज्यपाल बनू शकत नाहीत,’ असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.