मुंबई, 16 जुलै : आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होते असं वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी आता आणखी एक नवा शोध लावलाय. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे आणि राज्यघटनाही आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून लिहिली असा दावाच भिडेंनी केलाय. न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक डाॅ.उदय निरगुडकर यांनी संभाजी भिडे यांची बेधडक या कार्यक्रमात मुलाखत घेतली. या मुलाखतीत संभाजी भिडेंनी आंबापुराण, मनुवाद, भिमा कोरेगाव हिंसाचारावर उघड भाष्य केलं. एवढंच नाहीतर भिडेंनी मिलिंद एकबोटेंना क्लिन चिटही दिली.
मी ज्ञानोबा आणि तुकोबांची मनुबरोबर तुलना केली नाही. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते.मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता. त्या पुतळ्याखाली "मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता" असं बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलंय असा दावाच भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला. याचा पुरावाही मिळेल ते मीडियाने शोधून काढावे असा सल्लाच त्यांनी दिला.
'संभाजी ब्रिगेड अतृप्त आत्मे'
भिमा कोरेगावची दंगल ही मिलिंद एकबोटे यांनी पेटवली. प्रकाश आंबेडकर यांना दिलेली नाव हे संभाजी ब्रिगेड यांनी दिलं होतं. संभाजी ब्रिगेडनेच भिमा कोरेगावाची दंगल पेटवली होती. हे अतृप्त आत्मे आहे अशी टीकाही
'मनुचा जपानमध्ये पुतळा'
मनुस्मृतीचा द्रोह हा सुरू आहे लोकं ऐकणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला.
'आंब्यामुळे पुत्रप्राप्ती होतेच कोर्टात पराव्यानिशी सिद्ध करेन'
तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते या विधानावर संभाजी भिडे गुरूजी ठाम आहे. गरज पडली तर ही कोर्टात पराव्यानिशी सिद्ध करेन असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं. तसंच तो विशिष्ट आंबा खाल्ल्याने माणसी सेक्स पॉवर वाढते. या आंब्यावर ऑस्ट्रेलियात संशोधन झालं आहे. त्यात या आंब्यात ही शक्ती असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतातही अनेकांनी सशोधन केलं असून त्यातही ती गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे हे योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे असंही भिडे म्हणाले.
भिडेंचं विधान बिनबुडाच -हरी नरके
दरम्यान, मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं आहे अशी टीका प्रा.हरी नरकेंनी केली.
ते म्हणाले, राजस्थान विधिमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे. प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे अशी टीकाही नरकेंनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत. त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. उलट मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये मनुस्मृतीसारख्या सर्व जुन्या कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे. तेव्हा भिडे यांच्या वरील दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत असं हरी नरकेंनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.