मुंबई 25 ऑक्टोबर: अमृता फडणवीस या सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता तर त्यांनी महाविकास आघाडी सरकारला महासरकार व्हायरसची उपमाच दिली आहे. कोरोना व्हायरस आणि महासरकार व्हायरस कधी, केव्हा आणि कसे निर्दोष लोकांना आपल्या कचाट्यात घेईल हे काही सांगता येत नाही अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. सरकारचा कोप टाळायचा असेल तर तोंडावर पट्टी बांधा, काहीही बोलू नका आणि सुरक्षित राहा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
एका पत्रकारावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधातल्या ट्विटवर उत्तर देताना त्यांनी राज्यातल्या महाआघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सरकार विरुद्ध बोलले की कारवाई होते. सरकारला विरोध सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही बोलू नका. कोरोना व्हायरसची जशी केव्हा, कुठे, कधी आणि कशी बाधा होईल हे सांगता येत नाही त्याचप्रकारे या सरकारचं काम असून ते केव्हाही तुमच्यावर कारवाई करू शकते असच त्यांना त्यातून सूचित करायचं होतं. या आधीही अमृता फडणवीस यांनी अनेकदा राज्य सरकारवर टीका केली होती.
त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला होता. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अमृता फडणवीसांचा सोशल मीडियावरचा सर्व रोखच बदलून गेला आहे. त्या आधा त्या फारशा राजकीय विषयांवर आपली मतं व्यक्त करायच्या नाहीत. मात्र नंतर त्यांनी राजकीय विषयांवरही मतं व्यक्त करायला सुरूवात केली होती. त्यामुळे अनेकदा राजकीय वादंगही झालं होत.
कोरोना वायरस और महा सरकार वायरस दोनो ही कब, कैसे, कहाँ मासूमों पर हावी हो जाए कह नहीं सकते !
क्वारंटाइन से बचने के लिए दूरी बनाए रखे और लगातार मुँह पर पट्टी लगाए रखे !
सुरक्षित रहे ! चुप रहे ! #Dussehra #rawan #ReleaseSammetThakkar https://t.co/z2vs9QcFKX
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 25, 2020
अमृता फडणवीस या ट्विटरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधत असल्यानेच आता अमृता यांच्या ट्विटर हँडलचीही चर्चा होत आहे. अमृता फडणवीस यांना ट्विटरवर जवळपास 1 लाख 45 हजार लोक फॉलो करतात. तर अमृता फडणवीस या फक्त 4 व्यक्तींना ट्विटरवर फॉलो करतात. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. तसंच अमृता फडणवीस या पंतप्रधान कार्यालायच्या ट्विटर हँडललाही फॉलो करतात.
अमृता फडवीसांचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे. त्यांनी काय करावं हे मी त्यांना सांगत नाही. त्यांच्या काही मतांमुळे त्यांना टीकाही सहन करावी लागते त्यासाठी त्या समर्थ आहेत असं फडणवीस यांनी या आधीच स्पष्ट केलं होतं.